कलना – पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारनेच पीएम-किसान योजना या राज्यात लागू करण्यास अनुमती दिली नाही, त्यामुळे त्या राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा निधी मिळू शकला नाही असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून सतत केला जात आहे. त्याला आज येथे बोलताना ममता बॅनर्जी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्या संबंधात ममतांनी म्हटले आहे की ही योजना राज्यात लागू करण्याची लेखी संमती आम्ही केंद्र सरकारला दिली आहे पण केंद्रानेच त्या योजनेसाठीचा निधी या राज्याला अजून दिलेला नाही.
केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना हा निधी दिला नसला तरी आम्ही राज्य सरकारच्यावतीने प्रत्येक शेतकऱ्याला रोख पाच हजार रूपयांची मदत दिली असून त्यांच्या पिक विम्याचेही पैसे आम्ही भरले आहेत.
त्या म्हणाल्या की पीएम किसान योजने अंतर्गत आलेल्या अर्जांची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे सहा लाख अर्ज पश्चिम बंगाल सरकारकडे वर्ग केले होते. त्यातील अडीच लाख अर्जांची छाननी करून आम्ही ते पुन्हा केंद्राकडे पाठवले आहेत. पण त्यांना अजून केंद्राने निधी दिलेला नाही असा आरोप त्यांनी आज येथील जाहीर सभेत बोलताना केला. भारतीय जनता पक्षाचे लोक सतत खोटे दावे करीत असून हिंदुत्वाबाबतही त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये भ्रामक प्रचार चालवला आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.