मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या, मात्र ‘आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, येथेच राहणार आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी वाढीसाठी काम करत राहणार. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. असे म्हणत या सर्व चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावरून आता ठाकरे गटाने मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजप पक्षावर टीका केली आहे.
काय आहे सामनाच अग्रलेख
भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरायचे. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयास पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्र कधीकाळी उद्योग, शेती, संस्कृती, कला, उत्तम प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था याबाबतीत देशात अव्वल होता. आज आपण वावड्या आणि रेवड्या उठवण्यात आघाडीवर आहोत. अजित पवार हे नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादीला ‘रामराम’ ठोकून भारतीय जनता पक्षाच्या तंबूत सहभागी होतील व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशा वावड्या उठवल्याने राज्यात म्हणे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार, सगळं वातावरण ढवळून निघणार वगैरे चर्चांना उधाण आलं, पण असे प्रत्यक्ष उधाण कुठे दिसेल तर शपथ! अजित पवार यांनी मुंबईत आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्या हाती फडफडत असल्याचे वृत्त माध्यमांवर गेल्या चार दिवसांपासून तडतडत आहे, पण सत्य असे आहे की, चार दिवसांपूर्वी अजित पवार हे नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेस हजर होते. त्याच संध्याकाळी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच विमानाने मुंबईत परतले. मुंबईत उतरताच ते उद्धव ठाकरेंसोबत खारघर येथील ‘महाराष्ट्रभूषण’ सोहळय़ातील दुर्घटनेत उष्माघाताच्या तडाख्याने आजारी पडलेल्यांच्या भेटीसाठी इस्पितळात पोहोचले. अजित पवार यांचे वागणे-बोलणे, वावरणे एकदम नॉर्मल आहे व सर्व काही आलबेल असल्याचेच हे लक्षण आहे. अजित पवार यांनी स्वतःदेखील आता साफ इन्कार केला आहे. अजित पवार यांनी आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन जाहीर केले की, ‘माझ्याविषयी उगाच वावडय़ा उठवू नका. मी कोठेही जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे.’ अशा प्रकारे स्वतः श्री. अजित पवार यांनीच सर्व शंका-कुशंकांना तिलांजली दिली हे बरे झाले. श्री. पवार हे मंगळवारी सकाळी विधान भवनातील त्यांच्या कार्यालयात गेले व तेथे त्यांना
त्यांच्या पक्षाचे आमदार
भेटायला आले. यात नवल ते काय? अजित पवार हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत व पक्षाचे बरेचसे काम तेच पाहतात. त्यामुळे वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे. भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे हे एक गमतीशीर गृहस्थ आहेत व त्यांच्या विधानाकडे निव्वळ गंमत म्हणूनच पाहावे लागेल. आता बातमी आली की, महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या भाजप नेत्यांना दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने बोलावले. आता हे महत्त्वाचे नेते कोण, तर बावनकुळे व आशीष शेलार. म्हणजे अजित पवारांसारखा बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपात प्रवेश करतोय आणि त्याबाबत चर्चा करायला कोण दिल्लीत जात आहेत, तर हे दोन ‘वेलदोडे’. तेव्हा कोणत्या वावड्या किती गांभीर्याने घ्यायच्या? स्वतः अजित पवार म्हणतात, ‘‘मी कुठेच गेलो नाही व जात नाही.’’ तरीही भाजपपुरस्कृत माध्यमे अजित पवारांना पुनः पुन्हा जात्यात घालून भरडत आहेत. दुसरी गंमत अशी की, श्री. मिंधे व त्यांच्या लोकांनी पक्ष सोडताना अजित पवारांवर आरोप केले. अर्थमंत्री असलेल्या पवारांनी निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना डावलले, अजित पवारांमुळे शिवसेना फुटली वगैरे आरोप या मंडळींनी तेव्हा केले. मात्र आज तेच वेगळय़ा भूमिकेत आहेत. पुन्हा ढोंगबाजी अशी की, अजित पवार भाजपबरोबर आले तर त्यांच्या स्वागताचे बॅण्ड वाजवायला हे ‘फुटके’ व ‘फुकटे’ तयारच आहेत. केंद्राने अजित पवार यांच्यामागे चौकश्यांचा ससेमिरा लावला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचे व्यवहार, राज्य सहकारी बँकेच्या कर्ज वाटपाची चौकशी ही तथ्यहीन असली तरी विरोधकांना अशा चौकश्यांतून जेरीस आणायचे व मग
घाऊक पक्षांतरे
घडवायची हे भाजपचे धोरण आहे. अजित पवार हे मानी स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यांचा स्वभाव ताठर आहे. त्यांना वावगं झालेलं काही खपत नाही. त्यामुळे ते वावग्या लोकांबरोबर जाणार नाहीत. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. पक्ष त्यांनीच स्थापन केला व वाढवला. आजही ते पक्षवाढीसाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहेत. शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष अनेकदा फुटला व त्या राखेतून त्यांनी पुन्हा पक्ष उभा केला हे महाराष्ट्राला माहीत आहे. शिवसेना आमदारांचा गट भाजपने पह्डला, पण ते शिवसेना संपवू शकले नाहीत. शिवसेना जागेवरच आहे व राहील. सध्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले, पण भाजपसाठी ‘शिंदे’ गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरू आहे. आश्चर्य असे की, कालचे बाहुबली श्री. फडणवीस राज्यातील या सगळय़ा उपक्रमात पूर्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे सगळय़ात मोठी उलथापालथ ही भाजपअंतर्गत सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस पह्डून स्वतःचे घर भरायचे. काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयास पूर्णविराम मिळाला आहे.