आ. बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मसूर – आर्थिकमंदी, नोटाबंदीचा फटका, फसवी कर्जमाफी, पूरग्रस्तांसाठीचे फसलेले नियोजन, शेतकऱ्यांवर झालेला अन्याय, अन्य सर्वच बाबतीत युती शासनाच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. शासनाची धोरणे, घोषणा याबाबतीत संभ्रमावस्था आहे. शासनाची अन्यायकारक धोरणे, विचार जनतेसमोर आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिव स्वराज्य यात्रेचे जिल्ह्यात 28 ऑगस्टला आगमन होणार आहे. यात्रेचे स्वागत जल्लोषात करा. यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या कराड उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, उपसभापती सुहास बोराटे, माजी सभापती शालन माळी, नंदकुमार बटाणे, अशोकराव पाटील-पार्लेकर, प्रशांत यादव, पांडूरंग चव्हाण, प्रणव ताटे, आजी-माजी पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे अन्य पदाधिकारी यांच्या समवेत शासनाच्या अन्यायकारक धोरणासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या फसव्या घोषणा, दिशाभूलीचे राजकारण, अपयश यात्रेत मार्मिकपणे मांडले जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पाईक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या यात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यात्रा कराडला यशवंतराव चव्हाण समाधी स्थळापर्यंत जाणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.
सुनील माने म्हणाले, मराठवाड्यात शिवस्वराज्य यात्रेस चांगला पाठिंबा मिळाला. केंद्र शासनाने महाराष्ट्रावर अन्याय केला. नोकरदार, शेतकऱ्यांच्या, कामगारांवरील अन्याय र्दुदैवी आहे. मराठा समाजाच्या वसतिगृहाचे आश्वासनही फोल ठरले. शेतीमालाला दर नाही. नवीन उद्योग नाहीत. शिवसेना तर सत्तेसाठीच सहभागी आहे.
देवराज पाटील म्हणाले, केंद्रात वेगळ्या विचारांचे सरकार आहे. सरकारच्या घोषणा फसव्या ठरल्या आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून नेते जनतेसाठी कार्यरत आहेत. पुलवामा हल्ला कशाप्रकारे झाला याचा खुलासा भाजपकडून झाला नाही. पूरग्रस्तांसाठी शरद पवारांनी माणुसकी दाखवली. भाजप नेते मात्र पूरग्रस्तांकडे उशिरा पोहोचले. मानसिंगराव जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सुहास बोराटे यांनी आभार मानले.