पुणे – केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचे कार्ड जे नागरिकांसाठी आले होते ते आमदारांनी पळवल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे.
डिसेंबर 2018मध्ये आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींचे कार्ड महापालिकेत आले. त्यानुसार लाभार्थींना “जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातून आपले कार्ड घेऊन जा’ असेही कळवण्यात आले. लाभार्थीं गेले तेव्हा त्यांना कार्ड आमदारांनी नेल्याचे सांगितल्याचा दावा तुपे यांनी केला आहे. लाभार्थींनी आमच्याकडे तक्रार केली असून, कार्ड दिले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर, सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता “एका आमदाराने लाभार्थींचे कार्ड चोरून नेली आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यालयात जा आणि कार्ड मिळवा,’ असे सांगण्यात आल्याचा आरोपही तुपे यांनी यावेळी केला.
हडपसर भागात 15 ते 17 हजार जण “आयुष्मान’चे लाभार्थी आहेत. शहरात आठही आमदार भाजपचे आहेत. या आमदारांपैकी कोणत्या आमदाराने या योजनेचे कार्ड चोरून नेले आहेत, की ज्यामुळे हे गरजू, आजारी, रुग्ण लाभापासून वंचित रहिले आहेत. याचा तपास व्हावा यासाठी पोलिसांत तक्रार दिली आहे. या संबंधी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
– चेतन तुपे. शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस