पुणे – कात्रज चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्तावित उड्डाणपूल अडचणीत सापडला आहे. या पुलासाठी काही जागा राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाची आहे. ती पुलासाठी द्यायची असल्यास बाधित होणारे चार पिंजऱ्यांमधील सुमारे 15 प्राणी इतरत्र स्थलांतरीत करावेत, असे निर्देश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला दिले आहेत. तर हे प्राणी इतरत्र हलविण्यासाठी जागाच नसल्याचे पालिकेने कळविले आहे. त्यामुळे या पुलाचे भवितव्य अधांतरी असल्याची माहिती मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी मंगळवारी दिली.
सुमारे 126 कोटी रुपयांच्या या पुलासाठी प्राणिसंग्रहालयाची जागा आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेने ही जागा देण्यास मान्यता दिली असली, तरी हे प्राणिसंग्रहालय केंद्रीय प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्या मंजुरीसाठी महापालिकेने हा प्रस्ताव पाठविला होता. त्यात या भागातून पूल गेल्यानंतर बाधित होणाऱ्या प्राण्यांची माहितीही देण्यात आली. त्यावर प्राधिकरणाने आक्षेप नोंदविले आहेत. हे पत्र महापालिकेस दि.5 ऑगस्ट रोजी पाठविण्यात आले. त्यात प्राधिकरणाने “पुलाचे खांब प्राणीसंग्रहालय आवारात करू नयेत, या पुलाचा आवाज तसेच बांधकामामुळे 15 प्राणी बाधित होत असून त्यांचे तातडीने स्थलांतर करावे’ असे आक्षेप घेतले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी पालिका आयुक्तांनी दि.8 ऑगस्ट रोजी प्राधिकरणाला पुन्हा पत्र पाठ वत “या 15 प्राण्यांचे स्थलांतर करण्यासाठी आमच्याकडे जागा नाही. प्राण्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून साऊंड बॅरियल लावण्यात येणार असून या बाबींचा विचार करून प्राधिकरणाने आपला 5 ऑगस्टचा निर्णय बदलावा,’ अशी मागणी केली आहे.
दरम्यान, हा पूल होणार असे गाजर दाखवून भाजप नेते पाठ थोपटून घेत आहेत. या भागातील एक खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.