नितीन थोरात लिखित “खंडोबा’ या कादंबरीतून आपल्याला खंडोबाच्या बालपणाचा नव्याने उलगडा होतो. खंडोबाचं बालपण सांगणारी मराठी साहित्यातली ही पहिलीच कादंबरी ही या पुस्तकाची जमेची बाजू. खंडोबाचा जन्म, आईवडील, भावंडं, सवंगडी, राज्य, युद्ध, मानसिक संघर्ष, प्रेम, वैर, विवाह, जेजुरीची निर्मिती अशा हजारो संदर्भांना स्पर्श करत लेखकाने एक नवं खंडोबाविश्व वाचकांसमोर ठेवलं आहे.
आजवर महाराष्ट्राच्या कुलदैवताला आपण अवतार म्हणून गौरवलं. त्या अवताराची चौकट बाजूला करत लेखकाने देवत्व लाभलेल्या एका शूर योद्धाच्या स्वरूपात आपल्यासमोर खंडोबा सादर केला आहे. त्यामुळे हा खंडोबा अधिक जवळचा आणि मानवी भावनांना स्पर्श करत आपलासा होऊन जातो.
कथेची सुरुवात कलियुगातल्या आदित्य नावाच्या एका मराठी चित्रपट दिग्दर्शकापासून सुरू होते. खंडोबावर चित्रपट करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर येतो आणि खंडोबाच्या आयुष्याचा उलगडा करण्याची त्याची धडपड सुरू होते. ही धडपड त्याला थेट खंडोबाच्या काळात घेऊन जाते आणि तिथून पुढे सुरू होतो खंडोबाच्या शोधाचा प्रवास. लेखकाने आदित्यच्या नजरेतून खंडोबा टिपला आहे. खंडोबाचं खरं नाव काय होतं, मनी मल्ल यांचं नाव काय होतं. खंडोबाचं आणि त्यांचं वैर काय होतं, खंडोबाचं मूळ गाव कोणतं, वंश कोणता, खंडोबाने दोन विवाह का केले, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे या कादंबरीतून मिळतात.
कादंबरी काल्पनिक असली तरी पौराणिक संदर्भांची पद्धतशीर गुंफन केल्यामुळे ते अगदी तंतोतंत खरे आणि वास्तवदर्शी वाटतात. खंडोबाला मानवी अवतारात सादर केल्यामुळे त्याच्या भावनांशी जोडले जाणे वाचक म्हणून सहजशक्य होते. देव काहीही करू शकतो. पण, माणूस हे कसं काय करू शकतो असा प्रश्न वाचकांना पडतो आणि त्याचं उत्तरही मिळू लागतं. मग आपोआप लोकांनी जनपद बहाल केलेला एक शूर योद्धा कशाप्रकारे अनभिषिक्त सम्राट बनतो याची खंडोबा ही कथा.
आपल्या घराच्या देव्हाऱ्यात असणाऱ्या प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, पार्वतीपुत्र गणपती, अंजनीसूत हनुमान अशा सर्व देवतांना लहानपण आहे. पण, देव्हाऱ्यासोबतच आपल्या मनाच्याही गाभाऱ्यात वसणाऱ्या खंडोबाला लहानपण नाही. तीच कमी भरून काढण्याचा प्रयत्न खंडोबा या कादंबरीतून झाला आहे. भक्तांच्या भावनांचा मान राखत खंडोबाच्या आयुष्यातले खाचखळगे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी प्रभावी ठरते.
विनायक सरदेसाई