डॉ. कुंडलिक केदारी हे प्रयोगशील रंगकर्मी आहेत. आदिवासी जगण्याची पार्श्वभूमी असल्याने त्यांनी आपल्या लेखनातून आणि मंचीय आविष्कारातून प्रामुख्याने आदिवासी जीवन व संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
आदिवासी व ग्रामीण जीवनावर त्यांनी काही लघुपट व चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत. समाजाचे रंजन व प्रबोधन करण्याच्या उद्देशाने लोककलेच्या अंगाने त्यांनी केलेले नाट्यलेखनही प्रभावी आहे. “रंगीला राजा’ हे त्यांचे लोकनाट्य प्रसिद्ध आहे. साधारण त्याच अंगाने त्यांनी “बाळ्याचं लग्न’ हे दोन अंकी प्रबोधनात्मक नाटक लिहिलं आहे, जे लळित प्रकाशनाने आपल्या हाती दिले आहे.
एक उच्चशिक्षित मुलगी शाळा न शिकलेल्या, गावात गुरं वळणाऱ्या अडाणी, बावळट अशा बाळूला प्रेमाच्या आधारे समंजस, शहाणे करते, अशी ही गोष्ट आहे. वर्गातील गुरुजींच्या माराचा धसका घेऊन पुढे शाळेत कधीच पाऊल न ठेवलेल्या “गुरेवळ्या’ बाळूला त्याचे शाळा शिकलेले दोन मित्र थट्टेत तो वयात आल्याची जाणीव करून देतात आणि लग्नाच्या विचाराने तो खुळा होतो. बालपणीच त्याची जिच्याशी लग्नगाठ ठरली होती,
ती शहरात राहणारी मामाची मुलगी आता वैद्यकीय शिक्षण घेऊन मानसोपचार तज्ज्ञ झालेली असते. अडाणी, बावळट बाळूच्या गळ्यात ती कशी माळ घालणार? मानसोपचाराचा एक प्रयोग म्हणून ती हे आव्हान स्वीकारते. प्रेमाने त्याच्याशी वागून त्याला माणसात आणते आणि नंतर त्याच्याशी लग्नसुद्धा करते. असे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे कथानक आहे.
प्रबोधनपर असा हा विषय केदारी यांनी प्रहसनाच्या शैलीत मांडला आहे. त्यांनी बाळूचे मित्र राजा व सर्जा या पात्रांच्या साह्याने प्रासंगिक विनोद साधले आहेत. शिक्षणामुळे मिळालेल्या आत्मविश्वासाचे उदाहरण मामाच्या मुलीमध्ये- अनितामध्ये दिसते. नवनवीन आव्हानं स्वीकारण्याचे धाडस आजच्या मुलींमध्ये दिसते. स्त्रियांनी शिक्षणाने आणि कर्तृत्वाने समाजात बरोबरीचे स्थान मिळवले आहे. कुटुंबाबरोबरच नोकरी-व्यवसायाची जबाबदारी त्या समर्थपणे पेलत आहेत. बदलत्या समाजाचे हे आश्वासक चित्र या संहितेतून उभे राहते. परिकथेच्या वळणाच्या या गोष्टीत केदारी यांनी आपल्या मिश्कील शैलीने रंग भरले आहेत.
ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे यांची प्रस्तावना या संहितेला लाभली आहे. त्यांनी या कृतीला “मुक्तनाट्य’ असे म्हटले आहे, जे समर्पक आहे. 43 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात या संहितेचे सादरीकरण झाले होते. व्यावसायिक मंचावर या नाटकाचे प्रयोग व्हावेत.
मनोहर सोनवणे