कविता लेखन हा माझा छंद असल्याचे लक्ष्मीकमल गेडाम त्यांच्या मनोगतात सांगतात. त्यांची कविताही छंदातून आल्याचे जाणवत राहते. असे असले तरी त्यांच्या कवितेचं सामाजिक मूल्य कमी होत नाही. आधी पाया, मग कळस हे कोणत्याही निर्मितीचे सूत्र. परंतु “झुंबरझुले’ या कवितासंग्रहातील अनेक कविता आधी कळस मग पाया या सूत्रातून आकाराला आल्याचे दिसते.
म्हणजे कसे? तर आपल्याला कोणत्या विषयावर लिहायचे (कळस) आहे हे आधी ठरवायचे; त्या अनुषंगाने चिंतन (पाया) करायचे? आणि मग कविता कागदावर उतरवायची. त्यामुळेच लक्ष्मीकमल गेडाम यांच्या कवितेला चिंतनशीलतेचा स्पर्श झाला असल्याचे दिसते. परिसस्पर्श, क्षुद्र कोण? यासारख्या कवितांकडे त्या दृष्टीने बघता येईल. क्षुद्र कोण? या कवितेतलं त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान माणसाला अंतर्मुख करतं.
जीवनाच्या विविध अंगांना आणि मानवी जीवनातील विविध भावभावनांना गेडाम यांची कविता स्पर्श करताना दिसते. स्त्रीवादाचं अवडंबर माजविण्यात त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसते. जीवनाशी, संस्कृतीशी, संस्काराशी त्यांची कविता संवाद साधताना दिसते. त्याचवेळी मानवी जीवनातील दांभिकतेवर, चुकीच्या रूढी परंपरांवर कोरडेही ओढते. त्या अनुषंगाने ग्रहण या कवितेचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. पूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी “दे दान सुटे गिऱ्हाण’ म्हटले जायचे.
आज समाजातील त्या घटकाने दान मागण्याचे थांबविले आहे. परंतु शिक्षण, नोकरी अशा सर्व क्षेत्राला डोनेशनचं, लाचेचं ग्रहण लागलं असल्याचं कवयित्री सांगते. कल्पतरू, गरिबाची व्यथा, भाव, दर्शनाची माळ, पाखरू, परिसस्पर्श, क्षुद्र कोण? ग्रहण, अनाथा प्रती, बळीराजा अशा सामाजिक भान बाळगणाऱ्या काही उल्लेखनीय कविता या कवितासंग्रहातील आपली ओळख ठसविण्याचा प्रयत्न करतात.
बळीराजा या निसर्ग कवितेतल्या –
अंगणीचा पारिजात
पानोपानी डवरला
खुले पाकळी पाकळी
आसमंती गंध गेला
या ओळी एक आंतरिक लय आणि ताल घेऊन अवतरलेल्या दिसतात.
भर्जरी संध्याकाळ या कवितेत गेडाम यांनी एक सुरेख संदेश दिला आहे. ते त्यांच्या पुढील ओळीतून लक्षात येईल –
सुखाचे क्षण वेचण्यासाठी
कर्तव्याचा डोंगर चढावा लागतो
कीर्तीचा सुगंध उमलण्यासाठी
कष्टाचा गाडा ओढावा लागतो
या कवितेत त्यांनी कष्टाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. एक अंगभूत बोध यात दिसून येतो. मुक्त छंद हाच गेडाम यांच्या कवितेच्या आविष्काराचा मार्ग आहे. त्यामुळेच या संपूर्ण काव्यसंग्रहात कुठेही छंदोबद्ध कविता आढळत नाही. असे असले तरी ही कविता जीवनमूल्ये सोबत घेऊन वावरते. त्यामुळे ती अधिक महत्त्वपूर्ण ठरते.
विजय शेंडगे