श्रीनगर- संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठा आणि दुकाने आज 63 व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली असली, तरी रविवारी सकाळी सुरू झालेल्या आठवडे बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी दुकानेही उघडण्यात आली होती. यातील बहुतांश दुकाने दुपारनंतरही सुरू होती. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी, भाजीपाला आणि अन्य घरगुती वस्तूंसाठी आठवडे बाजार हाच एकमेव आधार या नागारिकांसाठी उरला आहे.
श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात प्रत्येक रविवारी बाजार भरत असतो. मागील दोन महिन्यांपासून हा आठवडे बाजार भरला नव्हता, पण स्थिती बरिचशी सामान्य झाली असल्याने, रविवारी सकाळी आठवडी बाजार सुरू होताच लोकांनी प्रचंड गर्दी केली. शहरातील टीआरसी चौक आणि लाल चौक मार्गावर मुख्य आठवडे बाजार भरतो. नवीन कपडे, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी हजारो लोक यावेळी घरातून बाहेर पडल्याचे दिसून आले.
बाजारातील सर्वच दुकानांवर मोठी गर्दी होती. काश्मीर खोऱ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या हालचालींवर केंद्र सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, असा आरोप करणाऱ्या राजकीय विरोधकांना आणि पाकिस्तानलाही येथील नागरिकांनी या गर्दीच्या माध्यमातून जबरदस्त चपराक दिल्याचे मानले जात आहे.
सकाळच्या सुमारास शहरातील अनेक दुकाने उघडण्यात आली होती, यातील काही दुकाने सकाळी 11 च्या सुमारास बंद करण्यात आली, तर आठवडे बाजारातील गर्दी लक्षात घेऊन अनेक दुकाने सायंकाळपर्यंत सुरू होती.