रायपूर – कॉंग्रेसच्या लुटमार, अत्याचार आणि कुशासनापासून केवळ भाजपच राज्याला वाचवू शकते. भूपेश बघेल यांनी छत्तीसगडला गांधी घराण्याचे ‘एटीएम’ बनवून राज्याला विकासाच्या मार्गावरून वळवले. छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ केले जाईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूपेश बघेल सरकारविरोधात ‘चार्जशीट’ जारी केला आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी बघेल सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढाच अमित शहा यांनी यावेळी वाचला. बघेल सरकारविरोधात आरोपपत्र जारी करताना अमित शहा म्हणाले, “छत्तीसगडचा विकास व्हावा यासाठी केंद्राने अनेक योजना दिल्या होत्या. मात्र 2018 मध्ये स्थापन झालेल्या बघेल सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याऐवजी लुटमारीचे सरकार स्थापन केले.
वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 11 जागा भाजपा जिंकेल आणि केंद्रात मोदी सरकार येण्यापूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल. मी छत्तीसगडच्या जनतेला वचन देतो की भाजपची सत्ता आली तर प्रत्येक घरात शुद्ध पाणी पुरवठा होईल.
अमित शहा म्हणाले की, आगामी निवडणुका या छत्तीसगडला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठीच्या निवडणुका आहेत.
आदिवासींना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले होते, पण आज धर्मांतराचे वारे वाहत आहेत. छत्तीसगडच्या जनतेने ठरवायचे आहे की कौशल्य विकासाच्या नावाखाली तरुणांना ऑनलाइन जुगाराचे प्रशिक्षण देणाऱ्यांना कोणत्या सरकारची गरज आहे? अटलबिहारी वाजपेयी यांनीच छत्तीसगडची निर्मिती केली. आता भाजपच राज्याला घोटाळे आणि भ्रष्टाचारापासून वाचवू शकेल. आज मुख्यमंत्री भूपेश हे भ्रष्टाचार आणि चापलूसी करण्यात मग्न आहेत.
अमित शहा म्हणाले, विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले; बघेल यांनी तेही खाल्ले. वर्ष 2004 ते 2014 पर्यंत मनमोहन सिंग यांचे सरकार असताना दहा वर्षात फक्त 77 हजार कोटी मिळाले होते. पण मोदी सरकारने 9 वर्षात दोन लाख 38 हजार कोटी दिले. मात्र, आमच्या 15 वर्षांच्या सरकारच्या एक तृतीयांशही काम झाले नाही.
घरोघरी नळ योजनेत ते अडथळे निर्माण करत आहेत. भाजपचे सरकार आल्यावर प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळेल. कर्ज माफ करू, असे त्यांनी सांगितले होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. तेंदूपत्ता बोनस बंद झाला, तर आमच्या सरकारने चरण पादुका योजना सुरू केली. पूर्ण दारूबंदीचे आश्वासन दिले होते, मात्र कोटींचा घोटाळा केला आहे.
ऑनलाइन सट्टेबाजीत पाच हजार कोटींची फसवणूक, कोळशात दोन हजार कोटींचा घोटाळा, वनविभागात एक हजार कोटींचा घोटाळा, शेणखत घोटाळा, शेणखताच्या नावावर माती घोटाळा, डीएमएफ घोटाळा, पैसे घेऊन हस्तांतरण घोटाळा. असेच सुरु राहिले तर आम्ही सत्तेत आल्यावर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे टांगू.