आमदार मोहिते यांची भूमिका ः नेत ऐकत नसतील तर विरोधी भूमिका घेऊ
राजगुरूनगर (पुणे)- आम्ही अन्याय तरी किती सहन करायचा. सेझ, एमआयडीसी, चासकमान, भामा आसखेड, कळमोडी धरणासंदर्भांत तालुक्यावर अन्याय होत गेले. धरणातील पाणी तालुक्यातील जनतेला मिळत नाही. ते इतरत्र नेण्याचे प्रयत्न आहेत यासाठी माझा कडाडून विरोध आहे. करोना विषाणू संसर्ग काळात मला मोर्चे, आंदोलने करता आली नाहीत. कडक भूमिका घेता आली नाही. मी आज याबाबत बोललो नाही तर मला पुढचा काळ माफ करणार नाही. एकदा गेलेले पाणी आम्हाला पुन्हा मिळणार नाही. म्हणून पिंपरी चिंचवडला आम्ही पाणी देणार नाही, वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, असा इशारा आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांना आरोग्य किट वाटप आमदार दिलीप मोहिते, जि. प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत संवाद साधला. आमदार मोहिते म्हणाले, मागील दहा वर्षांत मी तालुका पुढे नेण्याचे काम केले. चास कमान, भामा आसखेड आणि कळमोडी धरणाची उर्वरित सर्व कामे केली. भामा आसखेड धरणातील पाणी पुण्याला देण्याचा घाट सरकारने घातला आहे. चास कमान धरणाचे पाणी शिरूर तालुक्याला पहिले दिले गेले. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मात्र पाणी नाही. हा खेड तालुक्यावर अन्याय केला जात आहे. चास कमान धरणातील 1.75 टीएमसी पाणी पीएमआरडीसाठी आरक्षित केले आहे. एक टीएमसी पाणी सेझला देण्यासाठी आरक्षित केले आहे. जर पावणेतीन टीएमसी पाणी गेले तर तालुक्यातील लोकांना पाणी कोठून मिळणार? कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्याला देण्यात येणार आहे.
- नेते ऐकत नसतील तर विरोधी भूमिका घेऊ
जिल्ह्यातील ज्या नेत्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करीत आहोत. ते आमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. ‘या बसा, चर्चा करा’, असे कधी होतच नाही. तालुक्यात हजारो प्रश्नांसाठी आम्ही नेत्यांकडे दाद मागतो. ज्यांच्यावर तालुक्याने विश्वास टाकला आहे. तेच याकडे कानाडोळा करत असतील तर या विरोधात भूमिका घेणे गरजेचे आहे. आम्हीच त्यांच्याकडे सर्व प्रश्न मांडतो, मात्र तुम्ही शब्द देऊन ते पूर्ण करीत नाहीत.
- एमआयडीसी आली सुविधांचे काय?
चाकण, खेड मधील मोठ्या उद्योगपतीनी तालुक्यातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. बाबा कल्याणीसारखे उद्योगपती तालुक्यातील 4 हजार एकर जमीनीचे मालक झाले; मात्र त्यांनी तालुक्यातील जनतेसाठी एकही हॉस्पिटल, दवाखाना उभा केला नाही. ज्यावेळी तुम्ही एमआयडीसी करता त्यावेळीच तेथे शिक्षण, आरोग्य, क्रीडा, वीज, पाणी कामगारवर्गासाठी मोठे हॉस्पिटल अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या असतात. फक्त तालुक्यातील जागा विकायच्या आणि त्याचे पैसे सरकारने घ्यायचे हेच काम झाले आहे.
आमच्या वरिष्ठांची भूमिका अनाकलनीय
आज राज्यात सेनेचे सरकार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आम्ही त्यांचे साथीदार आहोत. बाबू लोकांना पाहिजे तसे सरकार हवे असते हे लोकशाहीला घातक आहे. आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी सहकाराची भूमिका घेतली आहे. त्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे. तीच परिस्थिती तालुक्यातील अधिकाऱ्यांची आहे. याबाबत स्पष्ट भूमिका घेतली, त्यांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली; मात्र त्यांनी याबाबत कार्यवाही केली नाही.
- माध्यमांनी घातली साद
- तालुक्यातील अनेक प्रश्न सुटले नाहीत. ते सोडविण्यासाठी मी सरकारकडे आग्रही आहे पक्षाच्या नेत्यांकडे आग्रही आहे. मात्र ते सोडविण्याकडे नेत्यांचे फारसे लक्ष नाही म्हणून मी तालुक्याची वस्तुस्थिती आपल्या पर्यंत मांडली आहे. तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी मला साथ दयावी असे तालुक्यातील पत्रकारांना त्यांनी आवाहन केले.