नवी दिल्ली – केंद्र सरकारने संख्याबळाच्या जोरावर शेतीविषयक विधेयकांना संसदेत मंजुरी घेतली असून ही विधेयके म्हणजे शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट आहे, सरकारने त्याद्वारे शेतकऱ्यांच्या आत्म्यावरच हल्ला केला आहे आम्ही त्यातील तरतूदी कदापिही मान्य करणार नाही अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार प्रतापसिंग बाजवा यांनी दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की सरकार ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत असे म्हणते आहे ते साफ खोटे असून शेतकऱ्यांचे नुकसानच त्यातून होणार आहे असे ते म्हणाले. सरकार जो लाभ म्हणून सांगते आहे तो लाभ शेतकऱ्यांना नको आहे, तरीही तुम्ही याची जबरदस्ती का करीत आहात असा सवाल त्यांनी केला.
आजचा शेतकरी अडाणी नाही, या विधेयकामागचा सरकारचा हेतू त्यांच्या चांगला लक्षात आला आहे असेहीं बाजवा यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, सरकारला किमान आधारभूत किंमतीची सिस्टीमच मोडून काढायची असून शेती क्षेत्र मोठ्या कार्पोरेट हाऊसेसच्या ताब्यात देण्याचा सरकारचा सुप्त हेतू यातून स्पष्ट दिसतो आहे. सरकारने अत्यंत दुष्ट हेतूने या शेती विषयक तरतूदी केल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला.