पुणे (सुनील राऊत ) : आमच्या आजीच्या घरी गणपती बसवायचे, पण आम्ही हायस्कूलमधील मित्र एकत्र येऊन गणपती बसवायचो, त्यावेळी साहेबांकडे भेटायला आलेल्या लोकांकडून आम्ही एक एक रूपया वर्गणी घ्यायचो, कोणी पाच रूपये दिले तर काहीच बोलायलाचं नको अशा शब्दात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्या लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा तर, आता राज्यभर गणपतींच्या आरतींसाठी फिरत असलो तरी शेवटचे गणपती 1982 मध्ये पाहिले होते. त्यानंतर, पुन्हा पाहण्यासाठी वेळच नाही मिळाला असेही ते म्हणाले.
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विसर्जनाच्या दिवशी सकाळी सहा वाजताच गणेशमंडळांना भेटी दिली.त्यानंतर जवळपास सहा तास ते शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशमंडळांना भेट देत होते, तर काही वेळ त्यांनी मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीतही सहभाग घेतला, मात्र, मधल्या वेळेत त्यांनी, राजकीय पक्षांच्या सदस्यांशीही गप्पा मारल्या. मंडई येथे मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी काही वेळ पवार हे या ठिकाणी असलेल्या मांडवात बसले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधी तसेच कॉंगेससह, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी मनमोकळया गप्पा मारल्या.
” आपणही हायस्कूलमधल्या मित्रांसोबत गणपती बसवायचो, त्यावेळी आम्ही साहेबांकडे आलेल्या लोकांकडून वर्गणी घ्यायचो, एक रूपया मिळाला तरी त्या काळी आमच्यासाठी खुप असायचे, कोणी पाच रूपये दिले तर विचारायची सोयच नाही. ते दिवसच वेगळे होते.’असे सांगत, जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तर, शेवटचे सार्वजनिक गणपती कधी पाहिले आहेत? असा प्रश्न विचारला असता, दादांनी कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. “राजकरणात आल्यापासून गणपतीच्या आरती करायला जातोय, मात्र, गणपती बघायला फिरता येत नाही. गर्दीच एवढी होते की पाहताच येणार नाही. मात्र, 1981-82 मध्ये कोल्हापूरला असताना आम्ही मित्र मित्र रात्री पुण्यात गणपती बघायला यायचो आणि सकाळी निघून जायचो.’ असे सांगत तब्बल 40 वर्षांपूर्वी फिरलेल्या आठवणींना उजाळा दिला.
त्याला, खासदार करा मी शेती करतो..
यावेळी, गणपती न पाहण्यामागे राजकीय नेते झाल्याने पाहता येत नाही, गर्दी होते, माध्यमे आसपास असतात त्यामुळे पाहता आले नाहीत का असे विचारले असता, दादांनी आपल्या खासदारकीच्या उमेदवारीचा गमतीदार किस्सा सांगितला. 1987 मध्ये मला खासदार करावे म्हणून काही नेत्यांनी साहेंबाकडे आग्रह धरला. पण साहेबांनी थेट नकार न देता, ” अजितला खासदर करा, मी गावी जाऊन शेती करतो.’ असे सुनावले, त्यानंतर पुन्हा या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा कधीच याबाबत शब्द काढला नाही. मात्र, त्यानंतर 1978 ची खासदारकी 1991 पर्यंत चालली आणि 1991 मध्ये मला खासदार करण्यात आले. पण मी दिल्लीत रमलो नाही, मी आपला महाराष्ट्रातच रमलो. असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.