मुंबई : राज्यात निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले आहे. त्याअगोदर आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवले. दरम्यान उद्धव ठाकरे गटाला नाव आणि पक्षचिन्ह मिळाले असले तरी, शिंदे गटाला मात्र अद्याप पक्षचिन्ह मिळालेले नाही. यासंबंधी आज आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यावरून आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उठाव केला, आम्ही ४० आमदार आणि १० अपक्षांनी या उठावाला समर्थन केलं. त्यानंतर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, पुढे निवडणूक आयोगाकडे गेला. आता, निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आमच्या शिवसेनेला दिले आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदेंचे समर्थन आम्ही केलंय, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाला मिळालेल्या नावावरुन समाधान व्यक्त केले आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय झाला, तो आमच्यादृष्टीने अन्यायकारक होता. कारण, आमच्याकडे नंबर्स असताना, मेजोरिटी असतानाही आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह नाकारलं. पण, निवडणूक आयोगाने आमच्या शिवसेनेला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निश्चित केले. बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना आम्ही ह्या नावावर समाधानी आहोत. नक्कीच या संघटनेच्या मार्फत बाळासाहेबांचा विचार आणखी वृद्धींगत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा मला विश्वास आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.