सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना कोविड १९ विषाणूने भारतातही संकटकालीन परिस्थिती निर्माण केली आहे. देशभरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बळींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा झपाट्याने प्रादुर्भाव होत असलेल्या या विषाणूला न घाबरता देशवासीयांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या धोरणांवर विश्वास ठेवून त्यांना शक्य तितकी मदत आपल्याकडून झाली पाहीजे. म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अनावश्यक घराबाहेर न पडणे. घरात व आजूबाजूला स्वच्छता ठेवणे, हात वारंवार धुवणे, खोकताना व शिंकताना रुमाल वापरणे, बाहेर जाताना मास्क चा वापर करणे, शक्यतो प्रवास टाळणे, १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील वृद्धांची विशेष काळजी घेणे. अशा गोष्टी आपण निश्चितच करू शकतो.
याच काळात शाळा महाविद्यालयांना सुट्टया देऊन सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनीही या सुट्टयांमध्ये अभ्यासाबरोबरच कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सुट्टीचा आनंद म्हणून नातेवाईकांकडे जाणे टाळावे, तसेच त्यांना फोन करुन खबरदारीच्या उपायांची आठवण करून द्यावी, सोशल मिडीयाचा वापर जनजागृतीसाठी करावा.
या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही सरकारने काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटाइजर, हँडवॉश यांसोबतच जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत केला पाहिजे, रुग्णांसाठी मुख्य दवाखान्यांपासून दुसरीकडे वेगळे कक्ष स्थापन केले पाहिजे. शक्य तेवढे जास्त चाचणी कक्ष स्थापन केले पाहिजे, सार्वजनिक ठिकाणांचे व वाहनांचे निर्जंतूकीकरण करायला हवे.
या सगळ्यांत प्रत्येक नागरीकांचे हे कर्तव्य आहे की, सोशल मिडियातील अफवांवर विश्वास न ठेवता त्याचा प्रसारही करू नये व तसे करणे कायद्याने गुन्हा आहे याची माहिती असावी. सरकारी अधिकारी किंवा वैद्यकीय व्यक्तींकडून जी माहिती भेटते त्यावरच विश्वास ठेवावा.
या सर्व परिस्थितीत आपण असा संकल्प करू की, ‘स्वत:ला कोरोनाची लागण होण्यापासून वाचवू व इतरांनाही याची लागण होणार नाही यासाठी प्रयत्न करू’. तसेच पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यू’ या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊ व या संकटकालीन परिस्थितीवर मात करू. पण सध्यातरी, ‘कोरोना से डरोना आणि घरातच रहोना !’ हेच योग्य आहे.
– श्रीकांत कांबळे