370 रद्द केल्याने जम्मू काश्मीरचे भारतातील विलिनीकरणाची प्रक्रिया पुर्ण
चिकली – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते त्यांच्या कुटुंबासाठी काम करतात तर आम्ही केवळ देश हितासाठीच काम करतो असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी केले आहे. ते आज बुलढाणा जिल्ह्यातील चिकली येथील प्रचार सभेत बोलत होते. या प्रचारसभेतही त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जोर दिला.
ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दुसऱ्यांदा पुर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाल्यानंतर कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला. त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याच्या भारतातील विलिनीकरणाची प्रक्रिया पुर्ण झाली. देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांने असा धाडसी निर्णय घेतला नाही. या निर्णयामुळे आता काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग झाला आहे असे ते म्हणाले.
कलम 370 रद्द केले तर काश्मीमारात रक्ताचे पाट वाहतील असा इशारा कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी दिला होता, पण काश्मीरात रक्ताचा एक थेंबही सांडला नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेसने कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात संसदेत मतदान केले होते हे मतदारांनी लक्षात ठेवले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
आमच्यासाठी वोट बॅंकेच्या राजकारणापेक्षा देशाची सुरक्षा सर्वतोपरी आहे असेही शहा यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या राजकारणाशी कलम 370 चा संबंध काय अशी विचारणा विरोधक करीत आहेत पण संपुर्ण देशाला जम्मू काश्मीर हे राज्य भारतात पुर्ण विलीन होणे गरजेचे वाटत होते.
संपुर्ण देशवासियांचे स्वप्न मोदींनी पुर्ण केले आहे. तुम्हाला केवळ कुटुंबासाठी काम करणारे सत्ताधारी हवे आहेत की देशाचा विचार करून काम करणारे सत्ताधारी हवे आहेत याचा विचार जनतेने करावे असे आवाहन त्यांनी केले.