नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी युती तोडण्याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली. शहा म्हणाले, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी सभेत बरेच वेळा सांगितले होते जर आमची युती जिंकली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. आता ते एक नवीन मागणी घेऊन आले आहेत ते आम्ही स्वीकारू शकत नाही. असे शहा यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले.
अमित शहा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा बचाव देखील केला. शहा म्हणाले, यापूर्वी कोणत्याही राज्यात एवढा वेळ देण्यात आला नव्हता. राज्यपालांनी १८ दिवसांची मुदत दिली. राज्यपालांनी विधानसभेची मुदत संपल्यानंतरच पक्षांना आमंत्रित केले. शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी किंवा आम्ही देखील दावा केला. आजही एखाद्या पक्षाकडे संख्याबळ ते राज्यपालांकडे जाऊ शकतात.
अमित शहा म्हणाले, आजही कोणाकडेही संख्याबळ असल्यास ते राज्यपालाशी संपर्क साधू शकतात. राज्यपालांनी कोणालाही संधी नाकारली नाही. ते म्हणाले, कपिल सिब्बल यांच्यासारखे विद्वान वकील बालिश वादावादी करीत आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला सरकार स्थापण्याची संधी देण्यात आलेली नाही.