पंढरपूर – राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे सध्या सावंत चांगलेच चर्चेत आले आहे. यातच आता त्यांच्या आणखी एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे एका कार्यक्रमात सावंत यांनी आपल्या सभांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी जमल्याचा दावा केला आहे.
यावेळी तानाजी सावंत यांनी थेट अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे या दिग्गज नेत्यांसोबत स्वतःची तुलना केल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याआधीच त्यांनी महाविकास आघाडी सरकार उलथवून राज्यात झालेला सत्ताबदल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी घडवून आणल्याचे सांगितले होते.
तानाजी सावंत काय म्हणाले?
“सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहित होते, जे पटांगण आपण सभेसाठी घेतले होते ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनाही भरले नाही. आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरले नाही, अडवाणीजी यांनाही भरले नव्हते आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी 2017-18 च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून दाखवला,” असे विधान तानाजी सावंत यांनी केले.
याआधी तानाजी सावंत यांनी “2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केली. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून 150 बैठका घेऊन आमदारांचे मन वळले,” असाही दावा केला होता.