कर्जत – ज्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवलं, मोठ केलं त्याच आई-वडिलांना वृद्धापकाळात मरणयातना सोसाव्या लागत असतील, तर यापेक्षा विदारक चित्र समाजात कोणते असेल. असेच एक दुर्दैवी चित्र आज मिरजगाव पोलीस ठाण्यात पाहायला मिळाले. मरणावस्थेला टेकलेली 90 वर्षांची आजी आपल्या नातवासह आपल्याच पोटच्या पोरांविरोधात तक्रार दाखल करण्यास आली होती.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वर्षातला एक दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. सोशल मीडियाच्या या आभासी जगात खरी नाती मात्र कवडीमोल ठरताना दिसत आहेत. आपल्या मुलांचे सुखी संसार उभारण्यात आपलं अख्ख आयुष्य घालवणारी आजी देवाकडे मृत्यूसाठी विनवणी करताना दिसत होती. ज्या मुलांना लहानाच मोठं केलं, नोकरीला लावलं त्याच मुलांनी वृद्धापकाळात सांभाळण्यास नकार दिला याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गुरवपिंप्री (ता. कर्जत) येथील यशोदा तुकाराम कवडे यांनी येथील पोलीस ठाण्यात नातवासह येऊन मला इच्छा मरण द्या… मला जगायचं नाही.. अशी विनवणी पोलिसांना केली.
या महिलेची विवंचना पाहून पोलीसदेखील भावनिक झाले. यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल करून घेऊन संबंधित महिलेच्या दोन नोकरदार मुलांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
या वेळी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या महिलेला तिच्या मुलांकडून वेळोवेळी अपमानित करून क्रूरपणाची वागणूक दिली जात आहे. महिलेला उपाशी ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे. पोलिसांनी देखील याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या वृद्ध महिलेला तिच्या मुलीकडे सांभाळण्यास पाठविले आहे.
ज्या ठिकाणी वृद्ध व्यक्तींना त्यांच्या मुले व नातेवाइकांकडून छळ, पिळवणूक आणि हेळसांड होत आहे, असे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्या व्यक्तीच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. आई-वडिलांना त्रास दिल्याचे निष्पन्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
सोमनाथ दिवटे , सहायक पोलीस निरीक्षक