सोलापूर – शेतकरी द्राक्ष बागायतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, मार्च मध्यापर्यंत किंवा मार्च अखेरीस करोनाची तिसरी लाट आटोक्यात येईल, असे तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांची संख्या घटत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच कोविड महामारी रोखण्यासाठी आयसीएमआरने कार्य केले आहे. मास्क मुक्तीबाबत तेच निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाइन विक्रीबाबत ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही. मद्यपान करु नये हाच महत्वाचा विषय आहे. तरीसुद्धा जगात सिगारेटसारख्या वस्तू सूचना देऊन विकल्या जातात. मद्यपानाला आरोग्य विभाग कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही. शेतकरी, द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, असे टोपे म्हणाले.
वाईन उद्योगामुळे शेतकरी, द्राक्ष बागायतदारांचे उत्पादन वाढावे म्हणून हा निर्णय घेतला आहे. जे उत्पादन होते त्या विक्रीसाठी एक योग्य मार्केटिंगच्या संदर्भाने एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आरोग्य विभाग मद्यपानाला कधीच प्रोत्साहन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.