मुंबई : सरकार स्थापन करताना घटनेच्या चौकटीत राहूनच काम करू, असे शिवसेनेकडून लेखी लिहून घेतल्यानंतरच सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी झाली… या विधानाचे सरकारमध्ये पडसाद उमटताच कॉंग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे.
मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले असून ‘हम साथ साथ है’…असे सांगत चव्हाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत सुरू असलेल्या कुरघोड्यांमध्ये भर पडली.
तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्षांचे सरकार आले, तर वादविवाद होतात, असे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मत असल्याने महाआघाडीत सामील होताना संविधानानुसारच काम करू असे शिवसेनेकडून लेखी वचन घ्या, असा आदेश त्यांनी दिला होता.
तसे शिवसेनेने लिहून दिल्यानंतरच आम्ही महाआघाडीत सामील झालो, असे चव्हाण म्हणाले होते. तर शिवसेना घटनेनुसारच काम करते, घटनेच्या कुठल्याही चौकटीला धक्का बसणार नाही, याची काळजी आम्ही नेहमीच घेतो. त्यामुळे काही लिहून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले होते.
परंतु, चव्हाण यांच्या विधानाचे आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटताच त्यांनी मंगळवारी सारवासारक करण्याचा प्रयत्न केला. मी तिन्ही पक्षांच्या समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तीनही पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखीत दस्तावेज आहे.
मी जे बोललो ते त्या अनुषंगाने होते. मात्र, माझ्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या, ती वस्तुस्थिती नाही. मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले असून ‘हम साथ साथ है’, असे अशोक चव्हाण म्हणाले.
एनआयएचा महाराष्ट्रात हस्तक्षेप नको!
भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्यास अशोक चव्हाण यांनी विरोध केला आहे. भीमा-कोरेगावसंदर्भातसंदर्भात फेरआढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते. पण त्यानंतर लगेच दोन दिवसात केंद्र सरकार या प्रकरणचा तपास एनआयएकडे देते, हे योग्य नाही.
त्यासाठी महाराष्ट्राची सहमती घ्यायला हवी होती. किमान चर्चा तरी करायला हवी होती, असे मत व्यक्त करतानाच केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय राहिला नाही तर राज्यांना काम करणे कठीण होईल, असेही चव्हाण म्हणाले. राष्ट्रपती राजवटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटते, हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हे सरकारच कायम राहू नये, असेही त्यांना वाटत असेल. पण हे त्यांचे हे स्वप्न “मुंगेरीलाल के हसीन सपने’सारखे आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.