मुंबई – भाजप खासदार अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला मिळालेल्या दुय्यम स्थानावर निशाणा साधला. काँग्रेसकडे राज्यात नेतृत्वाचा अभाव आहे. राज्यात त्यांना अवघ्या 17 जागा मिळाल्या. काँग्रेसची एवढी केविलवाणी परिस्थितीत यापूर्वी केव्हाच झाली नव्हती, असे ते सांगली व भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसने घेतलेल्या माघारीवर भाष्य करताना म्हणाले.
विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचे जागावाटप मंगळवारी पार पडले. त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 17 व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला 10 जागांवर समाधान मानावे लागले. मविआत सांगली व भिवंडी या 2 जागांवरून तिढा निर्माण झाला होता. ठाकरे गटाने सांगलीत कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तिथे काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक होते.
दुसरीकडे, भिवंडी लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाने सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठीही काँग्रेस आग्रही होती. पण प्रत्यक्ष जागावाटपात या दोन्ही जागांवर त्यांना माघार घ्यावी लागली. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी या मुद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला.
नाना पटोलेंसह थोरातांवर रोख –
काँग्रेसचे सांगलीतील नव्हे तर राज्यातील नेतृत्व कमकूवत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांना हाणला. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव नाही. पण त्यांचा रोख जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे.