मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील त्यांनी अनेक घोषणा केल्या. सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अर्थमंत्री अजित पवार चांगलेच संतापले.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच भाजपच्याच योजना सरकार नव्याने मांडत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावर अजित पवार चांगलेच संतापले. शुन्य टक्के व्याजाची भाजपची घोषणा आहे का ? महिलांसाठी जाहीर केलेला कार्यक्रम भाजपची घोषणा आहे का ? त्यांची काय मक्तेदारी आहे का ? आम्हाला काही कळत नाही का ? आम्ही एवढे वर्षे झालीत काम करतोय. त्यांना काय बोलायच ते बोलू द्या, आम्ही काही साधू संत नाही, असा आक्रमक पावित्रा अजित पवार यांनी घेतला होता.
जनतेला सरकारविषयी आपुलकी वाटावी, असा कार्यक्रम आम्ही देणार आहोत. जनतेने पुढील काळात महाविकास आघाडी सरकारचा विचार करायला हवा, असाच कार्यक्रम आम्ही दिल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्य लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.