मुंबई – उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रतन टाटांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.
25 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्य सरकारचा सर्वात मोठा पुरस्कार हा रतन टाटा यांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि रतन टाटा यांनी तो स्वीकारला याबद्दल मी टाटा ग्रुपला मनातून धन्यवाद देतो.
टाटा ग्रुप देशासह जगभरामध्ये विविध सेक्टरमध्ये अतिशय कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या वस्तूंपासून त्या महागड्या गाड्यापर्यंत तसेच एअरलाईन्सपर्यंत सर्व सेक्टरमध्ये टाटाचं नाव आहे. टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की रतन टाटा यांनी तो पुरस्कार स्वीकारला. आणि तो स्वीकारून पुरस्काराचा सन्मान अधिक उंचावलाय’ असं शिंदे यावेळी बोलले.
#WATCH | Industrialist Ratan Tata conferred with the Udyog Ratna award at his residence by Maharashtra CM Eknath Shinde and Dy CMs Ajit Pawar and Devendra Fadnavis pic.twitter.com/1s6GvxyZYh
— ANI (@ANI) August 19, 2023
पुरस्काराचे स्वरुप…
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.