– विजय लाड
कोयनानगर – गत चोवीस तासांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठ्याने अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. त्यानुसार जलपातळी नियंत्रीत करण्याचा प्रयोग धरण व्यवस्थापनाकडून करण्यात येणार असून ,
आज सोमवार, दि. 24 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वीत करून नदीपात्रात १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण व्यवस्थापनाने नदीकाठील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गत पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ १० टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याने सध्या अर्धशतक ओलांडले असून धरणात सध्या ५२ टीएमसी पाणीसाठा आहे.
पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५९,८५१ क्युसेक झाली असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यावरून पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरणात सध्या पाणी साठवण क्षमता शिल्ल्क असली,
तरी आत्तापासून धरणाची जलपातळी नियंत्रीत करण्यासाठी धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित करून आज सोमवार, दि. 24 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून नदीपात्रात १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले असून नदीकाठील गावांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.