Ind v Wi 2nd Test Day 4 Stumps : पोर्ट ऑफ स्पेन इथं दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकण्याची भारताला संधी आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर यजमान वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात 2 बाद 76 धावा झाल्या आहेत. त्यांना विजयासाठी आणखी 289 धावांची गरज आहे तर Team India ला विजयासाठी आणखी 8 गङी बाद करण्याची आवश्यकता आहे.
भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. टीम इंडियाला 183 धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव 2 बाद 181 धावा करून घोषित केला आणि एकूण 364 धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला 365 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मानं 57 तर इशान किशननं 52 धावा केल्या.
365 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला पहिला धक्का कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या रूपाने बसला. त्याला रविचंद्रन अश्विनने जयदेव उनाडकटच्या हाती झेलबाद केले. ब्रॅथवेटने तेजनारिन चंदरपॉलसोबत पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. तो 52 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 28 धावा करून बाद झाला.
यानंतर अश्विनने कर्क मॅकेन्झीला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मॅकेन्झीला खातेही उघडता आले नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चंदरपॉल 98 चेंडूत 24 धावा करून नाबाद असून जर्मेन ब्लॅकवुड 39 चेंडूत 20 धावा करून नाबाद आहे. आतापर्यंत दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी झाली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर यजमान वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावात 2 बाद 76 धावा झाल्या आहेत.
दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे खंडित झाला. दुसऱ्या सत्राचा खेळ पावसामुळे जवळपास वाया गेला. त्यामुळे पाचव्या दिवशीचा खेळ अर्धा तास आधी सुरू होईल. वेस्ट इंडिजच्या आठ विकेट्स घेण्यासाठी भारताकङे जवळपास 98 षटके असतील. त्याचवेळी वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या दिवशी आणखी 289 धावांची गरज आहे.
सोमवारी पाऊस न पडल्यास भारत कसोटी मालिका 2-0 ने जिंकू शकतो. डॉमिनिकामधील पहिली कसोटी टीम इंडियाने एक डाव आणि 141 धावांनी जिंकली होती.