सातारा – येथील रविवार पेठेतील प्रभाग 6 मधील पाणीपुरवठा बंद झाल्याने पालिकेची यंत्रणा धावली. नगरसेवकही रस्त्यावर उतरल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत केला. यावेळी जलवाहिनीमध्ये चक्क बाटल्या आणि शांपूची पाकिटे आढळल्याने पाणी साठवण टाक्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाणीपुरवठा बंद असल्याची तक्रार रविवार पेठेतील नागरिकांनी केल्याने नगरसेवक श्रीकांत आंबेकर व सविता फाळके यांनी त्या भागात धाव घेतली. त्यांच्या देखरेखीखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बगाडे हॉस्पिटलसमोर खोदकाम केले असता, पोवई नाक्याकडे गेलेल्या पाइपलाइनमध्ये प्लॅस्टिक व कचरा अडकल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याचे लक्षात आले. ही पाइपलाइन रस्त्याच्या मध्यभागी कापून त्यातून पाण्याच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, शांपूच्या बाटल्या व पाऊच निघाले.
मानस हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या घोरपडे टाकीतून हा कचरा पाइपलाइनमध्ये गेल्याने रविवार पेठेतील सर्वोदय कॉलनी, क्षीरसागर कॉलनी, कैकाडी वस्ती या भागातील पाणीपुरवठा सहा दिवस बंद झाला होता. पाणीपुरवठा समितीच्या सभापती सीता हादगे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सविता फाळके, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम संजय घाडगे, संदीप सावंत, संतोष घाडगे, बावणे, नंदकुमार कांबळे यांनी पूर्ण केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.