मुंबई – येत्या 31 मार्चपासून मुंबईत महिनाभर 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याचे काम या काळात केले जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून हे काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद केला जाणार नाही.
दुरुस्तीकामासाठी हा जलबोगदा पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. हा जलबोगदा बंद करून या काळात पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविणे आवश्यक आहे. परंतु, भांडुप संकुल येथे प्रक्रिया होत असलेल्या प्रमाणाइतके पाणी पोहोचविणे शक्य होणार नसल्याने पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी 65 टक्के पाणीपुरवठा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्राला होणारा 75 टक्के पाणीपुरवठा 5550 मिमी व्यासाच्या 15 किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. मात्र या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.
याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. याकरिता मुंबईतील नागरिकांना पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा लागणार आहे. यादरम्यान पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.