पुणे -शनिवारवाड्याच्या शंभर मीटरच्या परिसरात बांधकामांना घालण्यात आलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गंभीर्याने विचार करत आहेत. यासंदर्भात लवकरच आमदारांची बैठक बोलवून त्याच्यामध्ये या कायद्याचा फेरविचार करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्याचबरोबर जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाबाबतही चर्चा सुरू असून, लवकरच योग्य निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
देशभरातील पुरातत्त्व वास्तूंच्या शंभर मीटरच्या परिसरात पूर्णतः बंदी, तर 200 ते 300 मीटरच्या परिसरात पुरातत्त्व विभागाची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेऊन बांधकामांना परवानगी देणाचा निर्णय केंद्र सरकारने 2010 मध्ये घेतला. त्यामुळे शनिवारवाडा, पाताळेश्वर आणि आगाखान पॅलेसच्या परिसरात शंभर मीटरच्या परिसरात पूर्णतः बांधकामांना बंदी आली. त्याचा फटका जवळपास राहणाऱ्या हजारो मिळकतदारांना बसला आहे.
केंद्र सरकारला शिफारस करणार
महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना असलेल्या बंदी आणि जुन्या वाड्यांच्या प्रश्नासंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, केंद्र सरकारचा हा कायदा आहे. त्याचा फेरविचार करावा, याबाबत काय करता येईल यावर बैठकीत चर्चा करून केंद्र सरकारला शिफारस करण्यात येईल. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमधील जुन्या वाड्यांबाबत पाटील म्हणाले, या वाड्यांचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावता येईल, या दृष्टीने राज्य सरकारच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.