पुणे : यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे.त्यामुळे मुंबईत तापमान कमी असले तरी उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या मुंबईसह कोकण वगळता बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास गेले आहे.
हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने, मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने ३३.१ अंश कमाल तापमानाची नोंद केली. ठाणे आणि परिसरातील पारा मात्र ४० च्या जवळ पोहोचला होता. ठाणे आणि परिसरातील कमाल सरासरी तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यांत ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल, अमरावती, बुलढाणा ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर ३१ मार्च, नागपूर ३० मार्च या कालावधीत उष्णतेची लाट तीव्र जाणवेल.