आता आश्वासने नको ठोस उपाय द्या; अन्यथा रोषाला सामोरे जा-नागरिकांचे प्रशासनास थेट आव्हान
आळंदी – आळंदीकरांसह भाविकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देऊ… भामा आसखेड धरणाचे आळंदीकरांना पाणी मिळणार… आळंदीकरांना पाण्याची कमतरता पडणार नाही… ही आणि इतर आश्वासने राजकारणी, प्रशासनाकडून ऐकून ऐकून आळंदीकर वैतागले आहेत. गेली 10 ते 12 वर्षे ते पिण्यासाठी विकतचे पाणी घेत आहेत. तर पाणीपट्टी भरूनही जे प्रदूषित पाणी मिळत आहे. त्यावर आहे ते पाणीही वेळेवर व मुबलक प्रमाणात येत नसल्याने आता आम्हाला कोणतेही “आश्वासन’ या शब्दाचा वीट आला आहे. त्यामुळे आता आश्वासन नको ठोस उपाय हवा आहे, अन्यथा आळंदीतील पाणीप्रश्न “पेटणार’ असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आळंदीकर नागरिकांनी दिल्या आहेत.
आळंदीची लोकसंख्या 35 ते 40 हजारांवर जाऊन पोहोचली असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. आजूबाजूच्या परिसरात औद्योगिक परिसराचीही भर पडत आहे. हद्दवाढीचा प्रश्नदेखील सतावत आहे. दरम्यान, आळंदीला पाणीपुरवठा करण्यासाठी सिद्धबेट येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यात आळंदीकरांसाठी बारा महिने वाहणाऱ्या इंद्रायणी नदीतून पाणी उचलून ते जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे शुद्ध करून पुरवठा केला जातो. मात्र, ही जलशुद्धीकरण यंत्रणा या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने तोकडी, व कुचकामी ठरत आहे.
आळंदीच्या देहू फाटा परिसर, काळे कॉलनी, महादेव नगर, पुणे-आळंदी रोड, इंद्रायणी नगर, आळंदी मोशी रोड, तापकीर नगर आदी ठिकाणी नागरिकांना वर्षभरात केव्हाच वेळेवर व उच्च दाबाने पाणी न मिळाल्याने या भागातील नागरिक दर महिन्याला आळंदी नगरपालिकेवर हंडा मोर्चा, आंदोलन करीत आहेत. त्याचबरोबर आळंदी गावठाण, वडगाव, मरकळ, केळगाव, चऱ्होली खुर्द, पद्मावती रस्ता, चाकण चौक, खंडोबा मंदिर परिसर आदी ठिकाणच्या नागरिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने वारंवार पाण्याविषयी नगरपालिकेकडे तक्रारी दाखल होत आहेत. तरी देखील सुस्त शासन, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही.
तर याबाबत आळंदीकर केवळ खंत व्यक्त करण्याशिवाय काही करू शकत नसल्याची भावना प्रशासनाची झाली असल्याने आता आळंदीकर पाण्यासाठी पेटून उठला असून त्याने “आर या पार’ची भूमिका घेतली आहे. वडीवळे धरणाच्या उगमापासून तर श्रीक्षेत्र तुळापूरच्या संगमापर्यंत पवित्र अशा इंद्रायणी नदी गेली 10 ते 12 वर्षांपासून अक्षरशः गटारगंगा करून ठेवल्याने आळंदीकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. या आळंदीकरांसह भाविकांना या काळ्या शिक्षेकेला केवळ स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व नगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरकार हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला
पिंपरी-चिंचवड महापालिकाच कारणीभूत
इंद्रायणी नदीच्या उगमापासून ती खाली-खाली आळंदीतून पुढे मार्गक्रमण करते. मात्र, आळंदीत या नदीचे जे पाणी येते त्यात पहिलेच पिंपरी-चिंचवड महापालिकेसह औद्योगिक वसाहतीतून ड्रेनेजचे पाणी तसेच औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणारे पाणी विनाप्रक्रियाच नदीत सोडले जाते. त्यामुळे या पाण्याला केमिकलचा उग्र वास, पाण्यावर तरंगणारा केमिकलाचा तवंग, पांढरा शुभ्र फेसनिर्माण होत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही यावर प्रशासन काहीही न बोलत नसल्याने व कारवाई करीत नसल्याने आळंदीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याशिवाय पर्याय नसल्याने आम्हाला कोणीही वाली नसल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.