कामशेतकरांचे आरोग्य धोक्यात
कामशेत – आजच्या औद्योगिकीकरणाच्या युगात जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. या मानवनिर्मित समस्येचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतोच आहे. याबरोबरच अनेक नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम झाल्याचे पहावयास मिळते. याचप्रकारे कामशेत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात काही वाळू व्यावसायिकांद्वारे वाळूमधील माती काढण्यासाठी पाईपद्वारे गाडीवरून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. तसेच याठिकाणी मुंबई येथील भाजी मार्केटमध्ये जाणाऱ्या वाहनांमधील भाजीपाला देखील धुतला जातो. यामुळे पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने कामशेतकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कामशेत शहरातील इंदिरा आवास या ठिकाणी या वाळू व्यावसायिक वाळूमधील माती काढण्यासाठी पाईपद्वारे ट्रक, टेम्पोवरून पाणी सोडतात. परिणामी मातीमिश्रीत पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रात जाते. याच्या जवळच कामशेत ग्रामपंचायत यांच्या पाण्याची मोटार लाईन असल्याने ते पाणी ग्रामपंचायतीने साठवणी केलेल्या टाकीमध्ये जाते. यामुळे दररोज कामशेत येथील स्थानिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने अनेक संसर्गजन्य आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या वाळू व्यावसायिकद्वारे पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्यातच ट्रक लावले जात आहे. याचा स्थानिक चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याने यासंबंधित वाहनचालकांनी विचारणा केली असता त्यांना दमदाटीचे प्रकार वाळू व्यावसायिकांकडून केले जात आहे. या प्रकारामुळे कामशेतमधील नागरिक हैराण झाले आहे. यामुळे या वाळू व्यावसायिकांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
यासंबंधित प्रकारची दखल घेऊन आरोपींवर कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन खडकाळा ग्रामस्थांच्या वतीने कामशेत पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. तसेच या निवेदनाची लेखी प्रत तहसीलदार वडगाव मावळ व उपभियांता पाटबंधारे विभाग वडिवळे प्रकल्प यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.