मुंबई – लॉक डाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर लाखो लोकांच्या रोजगारावरही आघात झाला आहे. यामुळे भारतातील जनतेचे 13 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले. याचा बराच परिणाम जाणवू लागला आहे. आगामी काळात या परिणामाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा एका अहवालात देण्यात आला आहे.
यूबीएस सिक्युरिटीज या संस्थेने जारी केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत विकास दर वाढल्याची जी आकडेवारी जाहीर झाली आहे. ती थोडी आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे. लॉक डाऊनच्या काळात नागरिकांच्या 13 लाख कोटी रुपयाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत लोकांच्या खर्चावर परिणाम वाढणार आहे. या संस्थेने देशभरातील विश्लेषकाशी चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे. पुढील वर्षात विकास दर वाढणार असल्याचा दावा अनेक संस्था करीत आहेत. मात्र जर आगामी काळात नागरिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले नाही तर विकास दर अपेक्षित प्रमाणात वाढणार नाही. नागरिकांचे उत्पन्न इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची कसलेली शक्यता दिसत नाही.
खासगी क्षेत्राची गुंतवणूक थांबलेली आहे. अनुत्पादक मालमत्ता वाढण्याच्या शक्यतेमुळे बॅंका कर्जपुरवठा वाढवतील की नाही याबाबत शंका आहे. अशा अवस्थेत अर्थव्यवस्थेला आगामी काळात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकार पायाभूत सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. एवढीच एक जमेची बाजू आहे.
घरांची विक्री गेल्या काही दिवसात वाढत आहे, हे खरे आहे. मात्र बॅंकांनी व्याजदर कमी केले आहेत. तुंबलेली मागणी काही प्रमाणात पूर्ण होत आहे. त्यामुळे घरांची विक्री दीर्घ पडल्यात वाढत राहील याबाबत शंका आहेत असे या अहवालात म्हटले आहे. या अगोदर प्रदीर्घकाळ कर्जाचे राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण 72 टक्के होते. ते आता 90 टक्क्यावर गेले. त्यामुळे आगामी काळात कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणीच्या पर्यायाला मर्यादा येणार आहेत.