सातारा -उन्हाळ्यात कास तलावातून सातारा शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. पाणी पुरवठा समितीचे सभापती यशोधन नारकर यांनी ही माहिती दिली. ही पाणी कपात सोमवार, दि. 20 पासून करण्यात येणार असून या निर्णयामुळे आगामी दीड महिन्यात साडेतीन कोटी लीटर पाण्याची बचत होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणीपातळी 11 फुटांवर गेली आहे. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, यशोधन नारकर, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दिग्विजय गाढवे यांनी काही दिवसांपूर्वी कास तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर आठवड्यातून एक दिवस कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कास तलावातून 6 दशलक्ष घनमीटर पाणी दररोज शहराला पुरवले जाते. तलावातील साठा पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे किमान 15 जूनपर्यंत पुरवायचा झाल्यास शहरात एक दिवस पाणीकपात करणे अपरिहार्य आहे. तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा असला तरी मान्सून लांबणीवर गेल्यास पाणीटंचाई उद्भवू शकते.
त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असला तरी घंटेवारीत बदल करण्यात आलेला नसल्याचे नारकर यांनी सांगितले. प्रत्येक पेठेत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शहराच्या काही भागाला कास व शहापूर योजनेतून दररोज दहा दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. कास योजनेतील तीनपैकी पहिला व्हॉल्व्ह उघडा पडला असून दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागत आहे.
अशी होणार पाणीकपात
भैरोबा टाकी – सोमवार
व्यंकटपुरा पेठ टाकी – मंगळवार
कोटेश्वर टाकी – बुधवार
कात्रेवाडा टाकी – गुरुवार
बुधवार नाका टाकी – शुक्रवार
गणेश टाकी – शनिवार
जेल टाकी – रविवार