नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लढत असताना भारताचा शेजारी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. यावरून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानची तीव्र शब्दांत निंदा केली. या कठीण प्रसंगातही पाकिस्तानने आपल्या वृत्तीत किंचितही बदल केलेला नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जनरल नरवणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येतो आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनात पाकिस्तानकडून वाढच झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानवर टीका केली.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना जनरल नरवणे यांनी, कोरोना संक्रमणामुळे भारत आणि जगातील सगळेच देश या विषाणूविरोधात लढा देत आहेत. पण आमच्या शेजारील देशाने याही स्थितीत आपल्या कारवाया करणे सुरूच ठेवले आहे. या कठीण प्रसंगात भारत जगातील इतर देशांना वैद्यकीय स्वरुपाची मदत करतो आहे. औषधे, वैद्यकीय साधने निर्यात करण्यात येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून दहशतवाद निर्यात करण्याचे काम वेगाने सुरूच आहे.
काश्मीर खोऱ्यातील केरान भागात पाच एप्रिलला झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पण यावेळी पाच जवान शहीदही झाले होते. दहशतवादी घुसखोरी करून भारतात शिरण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी त्याचे हे कृत्य उधळून लावण्यात आले.