पवनानगर (वार्ताहर) – मावळ तालुका निसर्ग सौंदर्य नटलेला तालुका आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगररांगा आहेत. त्यामुळे या वन्यप्राणांचा वावर जास्त आहे. मात्र, या परिसरात डोंगरांना वनवे लावले जातात. त्यात मुक्या आणि दुर्मिळ होत असलेल्या अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून मावळ तालुक्यातील अनेक वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने प्राणी शहराकडेही धाव घेताना दिसत आहेत.
पवनमावळ,आंदरमावळ व नाणेमावळ यासह अति दुर्गम भागात मावळ तालुक्यातील डोंगररांगा आहेत. त्यात उन्हाची चाहूल लागताच डोंगरांना वनवे लावण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच वनव्यांमुळे व पाण्याच्या दुर्भिक्षामुळे या डोंगरांगांमधील प्राणी नागरी वस्तीकडे येताना दिसत आहेत. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून मावळ तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे.
पंरतु वनविभागचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कारण की, मावळ तालुक्यातील महागांव येथे गेल्या आठवड्यात एक कुत्रा तर वाऊंड येथे तरस जातीच्या प्राण्याची शिकाऱ्याच्या फास्यात अडकलेल्या अवस्थेत मिळाले तर लोहगड येथे एका शिकाऱ्यांनी ठेवलेल्या स्फोटक पदार्थामुळे गाईच्या तोंडाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे.
मावळ तालुक्यातील भागात मोठी वनराई जंगले आहेत येथे मोठ्या प्रमाणात वनविभागाचे क्षेत्र आहे. मात्र, येथे पाणवठे दिसत नाहीत. तसेच असलेल्या पाणवठ्यात पाणी उपलब्ध नाही. परिणामी तहान भागविण्यासाठी प्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. मोर, हरणे पाण्याच्या शोधात येत आहेत. गावामध्ये मोकाट कुत्र्यांच्या वावर मोठ्या संख्येने असल्यानेत्यांच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे वन विभाग व स्थानिक प्रशासनाने वनक्षेत्रातील पाण्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्याचा फटका वन्यजीवांनाही बसला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणवठे कोरडे पडले. त्यामुळे पशू-पक्षी तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. यावर उपाय म्हणून पाणवठे भरणे गरजेचे आहे.