राजगुरूनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले असून राजकीय धुळवड सुरू झाली आहे. विजयासाठी राजकीय नेत्यांची घालमेल सध्या वाढलेली आहे.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यासोबतच दुष्काळाचे चटकेही वाढू लागले असून, ग्रामीण भागात आता उन्हाबरोबरच राजकारणही तापू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकांच्या राजकीय गणितांची चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे.
अनेक सार्वजनिक कार्यक्रमात याची झलक दिसू लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. दोन्हीही मतदारसंघातील कट्टर विरोध असलेल्या युती आणि आघाडीचे उमेदवार ठरले असून आपल्याच पक्षातील किंवा आघाडी-युतीतील बंडखोर आव्हानही थंड करण्यात यश आले आहे. पूर्वी गावच्या पारावर रंगणार्या चर्चा आता सोशल मीडियावर जोरात सुरू झाल्या आहेत.
तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियातून एकमेकांचे उणेदणे काढत आहेत. गावोगावी नेत्यांची अधिकृत-अनधिकृत सोशल मीडिया फौजच जणू तयार झाली आहे. या प्रकारांमुळे जिल्ह्यात सर्वत्र राजकीय वातावरण तापलेले आहे. नेत्यांच्या अगोदर ही फौजच एकमेकांवर चालून जात आहे.
विधानसभेसाठी फिल्डींग!
जिल्ह्यातील अनेक राजकीय स्पर्धकही एकमेकांवर अगदी तुटून पडले आहेत. यातून कार्यकर्त्यांमध्ये अनेक वादविवाद सुरू झाले आहेत. एकीकडे राजकीय पुढारी गावोगावी फिरून कार्यकर्त्यांशी जोरदार संपर्क दौरे करीत आहे. तर काही ठिकाणी एकाच पक्षातील नेत्यांमध्ये तयार झालेली मोठी दुफळी पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थितीने संपुष्टात आली असली तरी मतदानापर्यंत ते मतद करतील की नाही याची धाकधूक उमेदवारांच्या मनात कायम आहेत.
एकंदरीत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. लोकसभेचे गणित लक्षात घेता विधानसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून अनेक गमती-जमती होत आहेत.
प्रचारदौर्यांचे नियोजन
काही नेते आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमाला दांडी मारत आहेत. कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. प्रत्येक तालुक्यात राजकीय पक्ष्यांकडे तगडी फौज असल्याने राजकीय प्रचार, दौर्यांना जोरदार सुरूवात झाली आहे.
काही नेत्यांनी तर आतापासूनच आपणच आगामी विधानसभेचे उमेदवार असल्याचे घोषित करीत प्रचारदौरे वाढवले आहेत. तर काही ठिकाणी तगड्या राजकारण्यांना बदनाम करण्याचे षड्यंड आखले जात असल्याची राजकीय चर्चा आहे. राजकीय वातावरण असे रंगले असताना यात आता मात्र उन्हाळाही जाणवू लागला आहे.