तळवडे आयटी पार्क : धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिक हैराण
पिंपरी – कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ होते. दुर्गंधी तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळते. त्यामुळे कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शहरामध्ये सर्रास कचरा जाळत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील विविध भागातील नागरिकांकडून सर्रासपणे रस्त्याच्या कडेला तसेच खुल्या मैदानांवरील कचरा जाळून नष्ट करण्याचा प्रकार सुरू आहे. तळवडे आयटी पार्क परिसरामध्ये मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जातो. येथील कंपन्यामधील कचरा जमा करण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे बहुतांश कंपन्यामधून रात्रीच्या वेळी कचरा मोकळ्या मैदानामध्ये टाकून पेटवला जात असल्याचा दावा स्थानिक नागरिक करतात. त्यामुळे प्रदूषणात भर पडत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा कचरा पेटविल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरामध्ये पसरतात. मैदानाच्या जवळूनच रस्ता असल्याने वाहनचालकांनाही धुराच्या लोटामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागते.
शहरात कचऱ्यासह पालापाचोळा, प्लॅस्टिक जाळताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कचरा जाळताना आढळल्यास 25 हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने शहारत सर्रासपणे कचरा जाळून नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे घर, इमारत, वस्तीच्या परिसरात असलेल्या शासकीय व खासगी खुल्या मैदानांवर वाढलेले गवतही परिसरातील नागरिकांकडून जाळले जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे.
ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांच्या आरोग्यावर परिणाम
कचरा जाळल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट परिसरामध्ये पसरल्याने श्वसनाचे विकार जडत आहेत. यासोबतच नागरिकांना दमा, त्वचा विकार, खोकला यासारख्या आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा परिणाम होत आहे.