वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्वच उपाय कूचकामी
उपाय सापडलाच नाही; तर कोंडीची जागा बदलली
– समीर कोडिलकर
पुणे – एसटी आणि पीएमपीचे मोठे बसस्थानक असलेल्या स्वारगेट परिसरात प्रवासी वाहनांची प्रचंड असते. त्यातच शहराच्या दक्षिण भागाला जोडणारा तसेच पूर्व भागातून पश्चिमेकडे जाणारा हा चौक असल्याने येथे वाहतूक कोंडीचे बेट तयार झाले. ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने या चौकात एक नाही, तर दोन उड्डाणपूल आणि भुयारी मार्गही बांधला. पण, या चौकातील कोंडीचे ग्रहण अजूनही कायम असून या पुलांमुळे वाहतूक कोंडीची जागा मात्र बदलली आहे.
स्वारगेट चौकात एस.टी. स्थानक, पीएमपी डेपो आहे. कात्रज आणि हडपसरकडून येणारे रस्ते सुद्धा याच चौकात येतात. तर मध्यवर्ती पेठातून शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्याने येणाऱ्या वाहनांसह सिंहगड रस्त्याकडून हडपसरकडे जाणारी वाहनेही येथूनच पुढे जातात. त्यामुळे जेधे चौकात वाहतूक कोंडीचा प्रचंड ताण होता.
ती फोडण्यासाठी पालिकेने पाच वर्षांपूर्वी येथे दोन उड्डाणपूल उभारले. त्यातील एक दुहेरी आहे. म्हणजे तो हडपसर आणि सारसबागेकडे उतरतो. तर, हडपसरकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गही आहे. मात्र, हडपसरकडून येताना या भुयारी मार्ग सुरू होतानाच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पीएमपी बस आणि अरूंद रस्त्यामुळे “बॉटलनेक’ तयार होऊन एकावेळी एकच गाडी भुयारी मार्गात जाते. परिणामी, हडपसर रस्त्याबाजूला वेगा सेंटरपर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर वाहनांच्या रांगा असतात.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या दशकभरात महापालिकेने पुणे विद्यापीठ, मगरपट्टा, हिंजवडी या प्रमुख चौकांसह पौड रस्त्यावर उड्डाणपूल बांधले. मात्र, प्रत्यक्षात येथील वाहतूक तसेच कोंडी फोडण्यासाठी या पुलांचा किती फायदा होईल, याचा फारसा विचार न करता कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पुलानंतरही येथील वाहतूक कोंडी कायम आहे. त्यामुळे हे चुकलेले पूल चांगलेच चर्चेचे विषय बनले होते. त्यामुळे जुन्या पुलांचा तमाशा लक्षात घेता नवीन पूल, नियोजन करून बांधले जातील अशी शक्यता होती. मात्र, आता नवीन पूलही कोंडी फोडण्यासाठी कुचकामी ठरले असून या पुलांमुळे वाहतूक कोंडीची फक्त जागा बदलली आहे. त्याचा आढावा घेणारी ही वृत्तमालिका.
एसटीच्या प्रवेशद्वारात वाढली कोंडी
कात्रजकडे जाणाऱ्या दुसऱ्या उड्डाणपुलाची सुरुवात स्वागरेट एस.टी. स्थानकाच्या दारातून होते. तेथेच पीएमपी बसेस उभ्या राहतात.या सगळ्यांत हा उड्डाणपूल दिसतच नाही. परिणामी, छोटी वाहने अडकून पडतात. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल सुटल्यानंतर वाहनांच्या रांगा लागतात. या काही मिनिटांतच जेधे चौकापर्यंत येतात. त्यामुळे शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्याने स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
पुलावर जाताना आणि उतरतानाही “बॉटलनेक’
साईबाबा मंदिर येथून सुरू होणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडी होते, ती सकाळच्या सुमारास. कारण, कात्रज तसेच बिबवेवाडी, मार्केटयार्ड येथून येणारी सगळी वाहने याच ठिकाणी एकत्र येतात आणि काही वाहने उड्डाणपुलावरुन जातात, तर मोठी वाहने पुलाखालून जातात. या पुलाची सुरुवात होते, तिथेच वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे रुंद रस्ता आणि अतिक्रमणे. “बीआरटी’साठी उभारलेले बसस्थानक मोठे असल्याने तेथे रस्ता अरूंद होतो. तर दुहेरी उड्डाणपूल ज्या ठिकाणी उतरतो, त्या सारसबाग आणि हडपसर येथे तशीच परिस्थिती असते. त्यात सारसबाग येथे जो उड्डाणपूल उतरतो, तेथे भुयारी मार्गाकडून वाहने येतात.त्यामुळे पुन्हा कोंडी होते. सर्व्हिस रोडकडून पीएमपी बसेसही तेथे एकत्र येतात. त्यामुळे कोंडी वाढते.