नवी दिल्ली, दि. 19- दिल्लीत जेव्हा करोना रूग्णांची संख्या तेव्हा सरकार झोपले होते का? असा जळजळीत सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला केला आहे. प्रशासनाने तेव्हा वेळीच हालचाल का केली नाही असा प्रश्नही न्यायालयाने त्यांना विचारला आहे.
दिल्लीत करोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आणि गेल्या 18 दिवसांत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातलगांना प्रशासन काय उत्तर देणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने पाउले का उचलली नाही याचे काय उत्तर तुम्ही लोकांना देणार आहात, असा सवाल न्या. हिमा कोहली आणि न्या. सुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने केला. स्थिती हाताबाहेर जात असताना आपण 1 नोव्हेंबरपासून त्याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपाची वाट पाहत राहीले. मात्र त्या अगोदर कोणतीही उपाययोजना केली नाही. लग्नकार्यांमध्ये केवळ 50 लोकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यासारखे उपाय का केले गेले नाहीत, असा प्रश्नही न्यायालयाने सरकारला विचारला.
शहरातील स्थिती बिकट होत असताना तुम्ही झोपलेले होते. 11 नोव्हेंबर रोजी आम्हाला तुम्हाला जागे करावे लागले. तुम्ही इतके दिवस कशाची वाट पाहत होतात? गेल्या 18 दिवसांत किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का, आणि या मृतांच्या नातलगांना आता तुम्ही काय सांगणार आहात, अशा प्रश्नांची न्यायालयाने सरकारवर सरबत्ती केली.