नवी दिल्ली – दिल्लीत करोनाची स्थिती नियंत्रणात आल्याचा दावा दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केला आहे. त्यामुळे आता दिल्ली सरकारने दिल्लीत लागू असलेला विकएंड लॉकडाऊन रद्द करण्याचा प्रस्ताव नायब राज्यपालांकडे पाठवला आहे. दुकाने उघडण्यासाठी सध्या जी सम-विषम पद्धत सुरू करण्यात आली आहे तीही बंद करण्याचा दिल्ली सरकारचा प्रस्ताव आहे.
जैन यांनी सांगितले की दिल्लीत करोना रूग्णांचे दैनंदिन प्रमाण एक लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण आता तो धोका टळला आहे. दिल्लीतील करोनाची स्थिती बरीच नियंत्रणात आली असल्याने शहरातील अन्यही निर्बंध काढून टाकण्याच्या संबंधात येत्या तीन चार दिवसांत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. शहरात काल करोनाच्या एकूण 12 हजार 306 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. तर करोना मृतांची संख्या 43 इतकी नोंदवली गेली आहे.