नवी दिल्ली – पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आम आदमी पक्षाला निमंत्रण न मिळाल्याने त्यांनीही सरकारवर जोरदार आगपाखड केली आहे. त्या पक्षाचे नेते संजयसिंह यांनी म्हटले आहे की दिल्लीसारख्या महत्त्वाच्या राज्यावर आमची सत्ता आहे. आम्ही पंजाबात मुख्य विरोधीपक्ष आहोत, तरीही आम्हाला सरकारने कमी लेखून सर्वपक्षीय बैठकीसाठी निमंत्रण नाकारले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर मोदी सरकारने देशातील सर्वच राजकीय पक्षांना विश्वासात घ्यायला हवे. केजरीवालांसारख्या तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याला या बैठकीसाठी निमंत्रण न देणे हे दुर्दैवी आहे, असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चीन सीमेवरील स्थितीसंबंधात भाष्य करताना ते म्हणाले की, या सीमासंघर्षात अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत, त्यांचे बलिदान सरकारने व्यर्थ जाऊ देता कामा नये. चीनने देशाशी विश्वासघात केला, पण सरकारने याविषयीची माहिती दडवली, ते तेथील स्थितीबाबत योग्य ती माहिती देशवासीयांना देत नाहीत.
सरकारने ही माहिती का दडवली याचे उत्तर देशाला दिले पाहिजे. याच पक्षाचे आणखी एक नेते गोपाल राय यांनी सांगितले की संसदेतील संख्याबळाच्या आधारे राजकीय पक्षांना सर्वपक्षीय बैठकांसाठी निमंत्रणाची पद्धत ठरवणे पूर्णपणे चुकीचे आहे.
ही सर्वपक्षीय बैठक ज्या नवी दिल्लीत होत आहे तेथे आम आदमी पक्षाचे सरकार आहे याचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे, असेह त्यांनी नमूद केले. या बैठकीसाठी आम्हाला बोलावले नसले तरी बैठकीत जो निर्णय होईल त्याचे आम्ही एक राष्ट्र म्हणून समर्थनच करू, असेही या पक्षाने म्हटले आहे.