बस्ती (उत्तर प्रदेश) – भारत आणि नेपाळच्या सीमाभागातील महारगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यामध्ये इस्लामिक स्टेटचे दोन संशयित दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागामध्ये “हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अब्दुल सामाद आणि इलियास हे दोन वॉन्टेड दहशतवादी उत्तर प्रदेशातून नेपाळमार्गे सटकण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी गुप्तचर विभागाची माहिती असल्याचे बस्ती विभागाचे पोलीस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांनी सांगितले.
या दोन्ही दहशतवाद्यांना ओळखता यावे म्हणून त्यांचे फोटो सर्वत्र जारी करण्यात आले आहेत. हे दोघेही इसिसशी संबंधित असल्याचा संशय आहे. मात्र ते नक्की कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत, याची माहिती उपलब्ध नाही. यापूर्वी या दोघांना पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये बघितले गेले होते. त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी मोठी मोहिम उघडण्यात आली होती.
भारत आणि नेपाळमध्ये 1,751 किलोमीटरची सीमारेषा आहे. या मार्गावरून पाकिस्तानी घुसखोर आणि दहशतवाद्युआंनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. अशा अनेक हस्तकांना भारतीय सुरक्षा रक्षकांनी पकडले होते. उत्तर प्रदेशातील पिलभीत, लाखिमपूर खेरी, बहारीच, स्रावास्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर आणि महारगंज या जिल्ह्यांना नेपाळची सीमा चिकटलेली आहे.