पुणेकरांवर दाखल्यांसाठी महापालिकेचे उंबरे झिजविण्याची वेळ
“सीएसआर’ यंत्रणेत त्रुटी, अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका
यंत्रणा वारंवार स्लो; दाखल्यांची माहिती भरण्यातही अडचणी
पुणे – मुलाच्या जन्मानंतर शाळा प्रवेशापासून व्यक्तीच्या मृत्यूनंतर लागणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय सोपस्कारांसाठी आवश्यक जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी पुणेकरांवर दोन-दोन महिने महापालिकेचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे. दाखले मिळविण्याची सेवा अधिक गतीमान तसेच पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार सिव्हीक रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीएसआर) अंतर्गत देण्यास मार्च 2019 पासून सुरुवात झाली आहे. मात्र, या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर यंत्रणेतील त्रुटी, अपुरे मनुष्यबळ तसेच अंमलबजावणीमधील अडचणींमुळे ही स्थिती उद्भवली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रणालीचा वापर सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून नागरिकांना अवघ्या दोन आठवड्यात दाखले मिळत होते.
केंद्र शासनाकडून महापालिकेस 2017 पासून या यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेकडून या यंत्रनेतील त्रुटी तसेच त्यासाठी उभाराव्या लागणाऱ्या यंत्रणेत अडचणी येत असल्याने त्याची अंमलबजावणी सुरू केली नव्हती. मात्र, मार्च 2019 पासून पालिकेकडून “सीएसआर’ यंत्रना कार्यान्वीत केली असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दाखल्यांची नोंदणी तसेच प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, केंद्र शासनाच्या सर्व्हरशी थेट जोडण्यात आलेली ही यंत्रणा वारंवार स्लो होत असून दाखल्यांची माहिती भरण्यातही अडचणी येत आहेत. परिणामी दाखले मिळण्यासाठी नागरिकांना दोन-दोन महिने हेलपाटे घालण्याची वेळ येत आहे. अनेकदा बाळाच्या जन्मानंतर परदेशी जाणारे नागरिक अथवा एखाद्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना दाखला अवघ्या काही दिवसांतच मिळने आवश्यक असते. मात्र, या यंत्रणेतील गोंधळामुळे नागरिकांना दाखलेच मिळत नसल्याने नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
सेवाहमी कायद्यालाही हरताळ
राज्य शासनाने लागू केलेल्या सेवाहमी कायद्यानुसार, नागरिकांना 24 दिवसांच्या आत महापालिकेकडून जन्म तसेच मृत्यूचा दाखला मिळने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने रुग्णालयांना बाळाच्या जन्मानंतर 21 दिवसांच्या आत महापालिकेस जन्माची माहिती कळविणे बंधनकारक आहे. तर ही माहिती आल्यानंतर 3 दिवसांच्या आत महापालिकेने दाखला तयार करून 24 दिवसांनंतर कोणत्याही स्थितीत नागरिकांना देणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रणालीत दाखले देण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे यंत्रणेची विभागणी करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालयाकडे माहिती येणे त्यानंतर त्याची नोंद सीएसआर प्रणालीत होणे आणि अंतिम दाखल्यासाठी ही माहिती जन्म-मृत्यू कार्यालयाकडे पुन्हा येणे यात जवळपास एक ते दीड महिन्यांचा कालावधी जात आहे. तर नंतर नागरिकांना प्रत्यक्ष दाखला हातात मिळण्यास आणखी दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे.