सातारा – गणरायाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून त्यांच्या जय्यत स्वागतासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधील मुख्य रस्त्यांवर गणेश भक्तांची गर्दी ओसंडून वाहू लागली आहे. बाप्पांच्या जयघोषासाठी शाहूनगरी सज्ज होऊ लागली आहे.
सातारा शहरात 94 तर जिल्ह्यामध्ये साडेतीनशेहून अधिक मंडळांची अधिकृत नोंदणी आहे. बहुतांश गणेश मंडळांनी आपली मंडप उभारणी अंतीम टप्प्यात आणली आहे तर काही प्रमुख मंडळांनी आपले गणराय मंडपामध्ये थाटामाटात वाजत गाजत स्थानापन्न केले आहेत. निर्बंधमुक्त गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. गणरायाच्या आगमनासाठी दोन दिवस बाकी असताना गणेश भक्तांची सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत तुडूंब गर्दी झाली आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली असताना, अवघे जनजीवन उत्साही झाले आहे. गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला असून या दिवशी गणराय आगमनाचा पुरता जल्लोष पाहायला मिळणार आहे.
गणरायाच्या आगमनाची घरोघरी धांदल
घरोघरी श्रींच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची धांदल उडाली आहे. उत्सवाची तयारी सुरू झाली असुन, अनेकांनी आदल्या दिवशीच गणेश मूर्ती नेण्याचे नियोजन केले आहे. बाजारपेठेमध्ये सजावटीचे साहित्य, गौरीचे मुखवटे, विद्युत माळा, चौरंग, पाट, पूजेचे साहित्य इत्यादी खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठ गणेशमय होऊन गेली आहे. गणेशोत्सव ही व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी असते. उत्सव काळात बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढते. आकर्षक साहित्य मांडणी व विविध ऑफर्स ठेवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यवसायिकांनी आपली दुकाने विद्युत रोषणाईने उजळवली आहेत. सायंकाळच्या वेळी विद्युत रोषणाईचा झगमगाट डोळ्यांचे पारणे फेडत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी जय्यत बंदोबस्त ठेवला आहे. सर्व मंडळांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सीसीटीव्ही बसवणे तसेच मंडळाच्या सदस्यांची नोंद ठेवणे, वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने मंडपांची रचना करणे अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. सातारा शहरांमध्ये आतापर्यंत 96 मंडळांना गुगल परवानगी देण्यात आली आहे, असे प्रशांत निकम यांनी सांगितले.