सासवड – पुरंदर तालुक्यात यंदा केवळ 37 टक्के पर्जन्यमान झाले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. बहुतांश गावांत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने संपूर्ण पुरंदर तालुक्यात 50 पैसे आणेवारी आणि दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करीत अशा दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून शेतकरी, सर्वसामान्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची माझी जबाबदारी आहे. याकामी शासकीय अधिकाऱ्यांनीही प्रामाणिक व संवेदनशीलपणे काम करावे, अशी सूचना पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केली.
पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक ठिकाणी विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करण्याबाबत सर्व्हे करून त्याबाबतचे अहवाल करण्याच्या सूचनाही जगताप यांनी दिल्या. सासवड येथे महसूल, कृषी, पंचायत समिती आदी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमआयडीसी, पाटबंधारे, कृषी, महसूल आदी सर्व
शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भागातील पाणीपुरवठा योजना, रिपण्याचे पाणी, चारा, जलस्रोतांचा तातडीने सर्व्हे करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन याप्रमाणे गावनिहाय वर्गीकरण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार-गावडे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, सासवडचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, जेजुरीचेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले उपस्थित होते.
यावेळी कर्मचाऱ्यांनी आपापल्या भागातील परिस्थितीची माहिती दिली. याबाबत सोमवारी (दि.18) सर्व शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावा, (दि.20) पुरंदर व जनाई उपसा सिंचन योजनांच्या अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबत जगताप यांनी सूचना दिल्या. तहसीलदार राजपूत यांनी सर्व शासकीय कर्मचारी संवेदनशील राहतील, अशी ग्वाही देत शासनाच्या सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी नेमलेल्या गावात किमान 5 दिवस जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या.
चारा लागवडीचे नियोजन करा
तालुक्यातील माहूर, मांडकी, गराडे, पिलाणवाडी पाझर तलाव आणि पुरंदर उपसा व जनाई उपसाच्या लाभक्षेत्रातील पाण्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात चारा लागवडीसाठी कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. त्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने चारा बियाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना जगताप यांनी दिल्या. खरीप पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.