दोन ठिकाणी जलवाहिनीत बिघाड
पुणे – उद्घाटन होऊन दोन आठवडे लोटले, तरी भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. शनिवारनंतर दोन ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व बिघडले. त्यामुळे अजूनही पूर्व भागाला हे पाणी मिळत नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. तर, हे पाणी येणार तरी कधी? असा सवाल आता या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
मागील आठवड्यात पालिकेने शुक्रवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला. यानंतर, हे पाणी येथील टाक्यांमध्ये सोडून पाणीपुरवठा सुरू केला जाणार होता. त्यामुळे प्रशासनाने 9 जानेवारीपासून टाक्यांमध्ये पाणी भरून त्याचा पुरवठा काही ठराविक भागासाठी करण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्याच दिवशी इंद्रायणी नदी परिसरात व्हॉल्व बिघडल्यानंतर महापालिकेच्या हद्दीतही काही ठिकाणी जलवाहिनी फुटली.
त्यामुळे त्यांची दुरुस्ती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे 9 तारखेपासून पाणी देण्याची घोषणा झाली असली, तरी ही मुदत उलटून चार दिवस झाले तरी अद्याप नागरिकांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांकडून तसेच नगरसेवकांकडून वारंवार प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली जात आहे.