डॉ. दिलीप गरूड
काळाच्या लांब-रूंद वाटेवर माणसं आपल्या कर्तृत्वाची पावलं उमटवतात. कुणाची पावलं ठसठशीतपणे उमटतात, कुणाची उमटल्यासारखी वाटतात, कुणाची पुसटशी उमटतात तर कुणाची अजिबातच उमटत नाहीत. महात्मा गांधी हे असं एक व्यक्तिमत्त्व होऊन गेलं की, त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटवली. 2 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांच्या जन्माला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचा मागोवा घेणे उचित ठरेल.
गांधीजी हे मातीतून मोठं झालेलं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे वर्णन ”A man from the dust” असं केले जाते. सत्य, अहिंसेचे ते पुजारी होते. त्यांनी आपणाला सत्य, अहिंसेचा विधायक मार्ग दाखविला. जगातील 179 देश त्यांचा जन्मदिवस “अहिंसा दिन’ म्हणून साजरा करतात.
आपणाला देशात आणि जगात खरोखरच शांतता हवी असेल तर गांधी विचारांची कास धरावी लागेल. भगवान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांनी आपणाला हे विचार पाथेय पुरवले आहे. आपला माणसांपेक्षा, विचारांपेक्षा शस्त्रास्त्रांवर जास्त विश्वास आहे. साऱ्या जगात दहशतवादाने थैमान घातले आहे. म्हणून आपणाला गांधी विचारधारेचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
चित्रपट निर्माता ऍटनबरो यांना गांधी विचारांची आवश्यकता पटल्यामुळेच त्यांनी गांधीजींच्या जीवनावर चित्रपट काढला. साऱ्या जगाने गांधी चित्रपट पाहिला आणि त्यांना गांधीजींचे जीवनदर्शन झाले. चित्रपट पाहून लोक थक्क झाले. लहानपणी अंधाराला घाबरणारा, प्रकृतीने अशक्त असलेला, सुरुवातीला कोर्टात आरगुमेंट करताना भीतीने घाम फुटलेला मुलगा महात्मा पदापर्यंत पोहोचतो हे आश्चर्यकारक होते. म्हणून अल्बर्ट आईनस्टाइन गांधीजींबद्दल म्हणतात, “अशा प्रकारचा हाडामांसाचा मनुष्य या पृथ्वीतलावर होऊन गेला. यावर पुढील पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील. तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले, “जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत जे सांगितले आणि आचरून दाखविले असे एकमेव म्हणजे महात्मा गांधी.’ फ्रान्सचे विचारवंत रोमॉं रोलॉं म्हणाले, “भारतात दुसरा येशू ख्रिस्त जन्माला आला आहे.’ अशा कितीतरी प्रतिक्रिया गांधीजींसंबंधी उमटल्या आहेत. या प्रतिक्रियांवरून त्यांचे मोठेपण अधोरेखित होते.
आज जगात सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुपोषण, दहशतवाद, अण्वस्त्र निर्मिती, विस्तारीकरणाचे धोरण असे प्रश्न आ वासून उभे आहेत. माणूस आदर्श विकासाच्या मॉडेलच्या शोधात आहे. कुणी त्यावर यांत्रिकीकरण हा उपाय सांगतात. पण यांत्रिकीकरणानेही सर्व प्रश्न सुटत नाहीत हे आता सिद्ध झाले आहे. महात्मा गांधीजींचे एक सुप्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात, “”ही पृथ्वी सर्वांच्या गरजा भागविण्यासाठी सक्षम आहे, मात्र, एका माणसाची हाव ती भागवूू शकणार नाही.” माणसाने आपली “हाव’ कमी केली तर बरेचस प्रश्न सुटणार आहेत. आजच्या प्रश्नांवर गांधीजींनी शोधलेले हे उत्तर आहे.
गांधीजींनी त्यांच्या जीवनात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भय वर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना या व्रतांचा स्वीकार केला. या व्रतांचा आपल्या देशाने “राष्ट्रीय व्रते’ म्हणून अंगीकार केला तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. गांधीजी हे एका माणसाचे सैन्य होते. त्यांना कुणीतरी संदेश मागितला. त्यावर ते म्हणाले, “”मी वेगळा संदेश देणार नाही. माझं जीवन हाच माझा संदेश आहे.” गांधीजींचे जीवन पारदर्शी आहे. नीतळ आहे. त्यात जसा चुकांचा कबुलीजबाब आहे तसा प्रयोगांचा हिशेबही आहे.
गांधीजी ही विसाव्या शतकातली भारताला मिळालेली देणगी आहे. पण गांधीजी आता भारतापुरते मर्यादित राहिलेले नसून ते “वैश्विक गांधी’ झाले आहेत. वकील, संपादक, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, नेता, महात्मा, समाजसेवक, राष्ट्रपिता असा त्यांचा 78 वर्षांचा दीर्घ प्रवास आहे. दिसायला साधे पण प्रचंड आंतरिक ऊर्जा असलेले गांधीजींचे आपण वारसदार आहोत. त्यांनी प्रत्यक्ष कृतीने आपणाला सत्य, अहिंसेचा जीवनमार्ग दाखविला. खादीचा स्वीकार, ग्रामस्वराज्य, सार्वजनिक स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, ग्रामोद्योग, दारूबंदी, नई तालीम, श्रमाचं महात्म्य, हिंदू-मुस्लीम ऐक्य, कुष्ठरोग निर्मूलन, निसर्गोपचार हे सारं त्यांनी आपणाला कृतीतून शिकवलं आहे.
गांधीजींच्या या मार्गाने गेल्यास देशाचे आणि जगाचे कल्याण होईल. न गेल्यास अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या या जगात कधी भडका उडेल आणि मानवजात संपून जाईल, हे सांगता येत नाही. म्हणून शस्त्रांपेक्षा गांधीजींनी सांगितलेल्या शास्त्रावर विश्वास ठेवायला हवा. एकविसाव्या शतकाची तीच मागणी आहे