हिमांशू
बापूजी, दीडशे वर्षं झाली तुमच्या जन्माला. तुम्हाला सव्वाशे वर्षं जगण्याची इच्छा होती. सव्वाशे वर्षांचं आयुष्य लाभल्याखेरीज आपलं कार्य पूर्ण होऊ शकणार नाही, असं तुम्हाला वाटत होतं. आम्हालाही वाटतं, खूप-खूप जगावं; पण अर्थातच आमच्या इच्छेमागे मृत्यूचं भय एवढंच कारण असतं. हे जग जगण्यायोग्य बनवण्यासाठी आम्ही काय करतो, या प्रश्नाला मात्र आमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही म्हणालात, खेड्याकडे चला! आम्ही शहरांकडे वाटचाल सुरू केली. खेडी ओस पडलीत आणि शहरं गर्दीनं भरून वाहतायत.
अनेक गोष्टी “अपरिहार्य’ म्हणून आम्ही स्वीकारून टाकल्यात. “हे असंच घडणार,’ हे आमच्या डोक्यावर कुणीतरी इतक्या जोरात थापलंय, की यापेक्षा वेगळं काही घडू शकेल, घडवता येईल याची कल्पनाच आम्हाला करता येत नाही. कितीतरी विकलांग झालो आहोत आम्ही. काही वर्षांपूर्वी आम्हाला कितीतरी टेलिफोन नंबर तोंडपाठ असायचे. आज आपलाच नंबर एखाद्याला सांगताना आपण चुकत तर नाही ना, अशी भीती आम्हाला वाटते. भीती हा तर आमच्या जगण्याचा आधारच झालाय. “निर्भय बनो,’ असं सांगून तुम्ही गेलात. पण भीतीच्या छायेत जगण्यासाठी आमच्याकडे एक सोडून असंख्य कारणं आहेत. सतत अस्मानी किंवा सुलतानी संकटाच्या भीतीखाली आम्ही वावरतो. इन्क्रिमेन्ट मिळेल की नाही, नोकरी टिकेल की नाही, इथंपासून घरी सुखरूप पोहोचू की नाही, याचीसुद्धा भीती!
आजन्म सत्याचे प्रयोग करत जगलात तुम्ही. सत्याचा स्वीकार करणं म्हणजे खूपच धाडसाचं काम. आम्ही मात्र “”कशाला भलतं धाडस!” असं म्हणून सत्य टाळायला सदैव तयार असतो. मुळात आजकाल आमच्यापर्यंत जे पोहोचतं, ते सत्य की असत्य हेच आम्हाला माहीत नसतं. फक्त ते स्वीकारायचं की नाकारायचं, एवढंच आम्हाला ठरवायचं असतं. मत बनवण्यासाठी सत्य जाणून घेण्याची मुळात गरजच नाही, या अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. केवढी ही मानवजातीची प्रगती! तंत्रज्ञानानं आमचं काम सोप्पं करून टाकलंय. आमचे पूर्वज कधीतरी सहीऐवजी हाताच्या अंगठ्याचा ठसा देत असत.
आम्ही मात्र साक्षर झालो, सुशिक्षित झालो. ज्ञानवंत झालो. इतके की आता पुन्हा अंगठ्यापर्यंत येऊन पोहोचलो. टीव्हीचा रिमोट आणि आमचा स्मार्टफोन. सगळं काही अंगठ्यानं करायचं. काही दिवसांनी आमची घरंही स्मार्ट होणार. घराबाहेर जाताना कुलूप लावायला, दिवे मालवायला विसरलो तरी टेन्शन नसेल. अनेक गोष्टी लक्षात ठेवायची निसर्गदत्त शक्ती आपल्याकडे आहे हेही आम्हाला आठवणार नाही. बरंय ना! चिंता करू नका बापू… नोटेवर तुमचा फोटो आहे, तोपर्यंत तुम्हाला नाही विसरणार आम्ही. व्हर्च्युअल बॅंका येतील तेव्हा नाइलाज होईल की काय, असंही वाटतं.
शुद्ध हवा, स्वच्छ पाणी या गोष्टींची किंमत मात्र तुमच्या काळात कुणालाच नसावी. आज पैसे मोजून बाटलीभर आरओ पाणी विकत घेतो, तेव्हा आम्हाला ती समजते. काही दिवसांनी कदाचित शुद्ध हवाही विकत मिळेल. तोपर्यंत झाडं तोडून, ओढे-नाले बुजवून इमारती कशा बांधायच्या, हाच आमच्या पुढचा प्राथमिक प्रश्न असेल. पृथ्वी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकते; हाव मात्र पूर्ण करू शकत नाही, हा तुमचा संदेश तूर्तास आम्ही विसरू इच्छितो.