वाघोली( प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी वाघोली ग्रामपंचायत लवकरच ऑक्सीजन प्लांट उभारणार असून नुकत्याच झालेल्या मासिक मिटिंगमध्ये ऑक्सिजन उभारण्यासंदर्भात कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतला असल्याची माहिती वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व शासकीय परवानगी घेऊन लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असणार आहे. भविष्यातील कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सीजन प्लांटची गरज असल्याने ग्रामपंचायत मासिक मिटिंगमध्ये ऑक्सीजन प्लांट उभारण्याची मागणी केल्यानंतर सर्व कार्यकारी मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले.
सदर खर्च 15 व्या वित्त आयोग निधीतून करण्यात येणार आहे तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गतवाघोली गावातील 2011 च्या जनगणनेनुसार 4900 लाभार्थ्यांची निवड झाली असुन प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा आयुष्य भर मिळणार आहे. सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर याचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असून सदर योजनेची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी सरपंच शिवदास उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे,ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, संदिप सातव, जयप्रकाश सातव, सुधीर भाडळे,मारुती गाडे,रामकृष्ण सातव,अर्चना कटके,वंदना दाभाडे, कवीता दळवी,मालती गोगावले, रेश्मा पाचरणे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.